देशासाठी लढताना आलेले अपंगत्व, काहींच्या नातेवाइकांनी सोडलेली साथ आणि शारीरिक व्यंगाशी झुंजताना आपल्या माणसांची वाट पाहणारे डोळे रविवारी पुणेकरांच्या प्रेमाने सुखावले. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दिसणारे कलाकार प्रत्यक्ष भेटले. एवढेच नव्हे तर, बहीण होऊन तिने या अपंग जवानांचे औक्षण केले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली. या जवानांशी तिने मनमोकळा संवाद साधला. गिरिप्रेमी विवेक देशपांडे, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, उमेश सकपाळ, गिरीश पोटफोडे, प्रणव पाटोळे आणि कल्पना ओव्हाळ या वेळी उपस्थित होते.
अपंग सैनिकांसमवेत साजरी केलेली भाऊबीज हा माझ्यासाठी आयुष्यातील सुवर्णक्षण असल्याची भावना मृण्मयी हिने व्यक्त केली. देशासाठी लढताना अपंगत्व आले असले तरी प्रत्येक सैनिक आजही तितक्याच जिद्दीने लढण्यास तयार आहे. त्यामुळे सामान्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असेही तिने सांगितले.
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे सामान्य नागरिक सुखाने जगत असतो. लढताना आलेल्या अपंगत्वावर मात करण्याची ताकद प्रत्येक सैनिकामध्ये आहे. युवा पिढीने सैन्यात दाखल होऊन देशसेवा रुजू करावी, असे विवेक देशपांडे यांनी सांगितले.
आम्ही अपंग असलो तरी शत्रूला पराभूत करू शकतो. शारीरिक अपंगत्व आले असले तरी आमची इच्छाशक्ती प्रबळ असल्याची भावना भोपालसिंग चौधरी यांनी व्यक्त केली. कोणी भेटायला आले तर आमच्यासाठी तो आनंदाचा दिवस असतो. पुणेकरांच्या प्रेमामुळे घरच्यांची उणीव कधीच भासत नाही, असे सांगताना राधाकृष्णन यांना आनंदाश्रू अनावर झाले. पराग ठाकूर, शिरीष मोहिते, कुमार रेणुसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.