पुणे: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पिस्तूल बाळगण्याची हौस वाढीस लागली आहे. पिस्तूल बाळगणे हे ‘स्टेटस सिम्बाॅल’ बनले आहे. त्यामुळे शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अनेक जण आटापिटा करतात. राजकीय प्रभाव, अधिकाऱ्यांशी सलगी करून परवाना पदरात पाडून घेतला जातो. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा पती, दिराने निवासाचे बनावट पत्ते दिले. तसेच शिवसेनेच्या (शिंदे) युवा सेनेचा पदाधिकारी नीलेश घारे याने पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी जिवाला धोका असल्याचा बनाव रचला. त्याने साथीदारांकरवी स्वत:च्या मोटारीवर गोळीबार घडवून आणला. या दोन प्रकरणांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अनेकांनी पिस्तूल परवाने कसे मिळवले, हे अधोरेखित झाले आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. पिस्तूल परवान्याबाबत कडक निकष जाहीर केले. गेल्या दीड वर्षात शस्त्र परवान्यासाठी आलेले ४०४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, तसेच १०४ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यंदा नव्याने फक्त २८ जणांना शस्त्र परवाना मंजूर झाला असून, त्यामध्ये दहा वारसा हक्क आणि नऊ शस्त्र परवाने क्रीडापटूंच्या कोट्यातून मंजूर करण्यात आले आहेत. शस्त्र परवान्यासाठी अनेक अर्जदारांनी स्वसंरक्षणासाठी परवाना हवा आहे, असे कारण दिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी, समाजात भीती निर्माण करण्यासाठी शस्त्र परवाना देणार नाही. परवान्यासाठी ठोस आणि जबाबदार कारण द्यावे लागेल, असे स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी आधी नाकारला होता. मात्र, त्याने गृह विभागाकडून त्यासाठी परवानगी मिळवली. चव्हाण याच्याविरुद्ध यापूर्वी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर चव्हाण याने गृह मंत्रालयात अपील केले होते. वैष्णवी यांचा पती शशांक आणि दिराने मात्र पुणे पोलिसांकडून पिस्तूल परवाना मिळवला होता. त्यासाठी त्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या सदनिकेचा करारनामा वास्तव्याचा पुरावा म्हणून दिला होता. पोलीस तपासात या बाबी उघडकीस आल्यानंतर वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढली आहे. पिस्तूल बेकायदारीत्या बाळगण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अनेक जण समाजात दहशत निर्माण करण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बेकायदारीत्या बाळगतात. देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्याच्या घटना शहरात घडतात. बिबवेवाडी भागात १५ दिवसांपूर्वी किरकोळ वादातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. गेल्या पाच-सहा महिन्यांत गोळीबाराच्या पाच-सहा घटना घडल्या आहेत. नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाईत किरकोळ वादानंतर हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. पुणे-सोलापूर रस्त्यावर एका मोकळ्या जागेत लघुशंका करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने रखवालदार दाम्पत्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार करण्यात आला होता. टोळक्याने केलेल्या दगडफेकीत एका महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

कोथरूडमध्ये वैमनस्यातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. बिबवेवाडीत वैमनस्यातून जामिनावर सुटलेल्या गुंडावर गोळीबार करण्यात आला होता. हडपसरमधील मांजरी भागात प्रतिस्पर्धी टोळीतील सराइताचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती.

या सर्व घटना विचारात घेतल्यास पुणे परिसरातील सराइतांकडे पिस्तूल कसे पोहोचते, हा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांकडून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली जाते. मात्र, ती जुजबी ठरत असल्याने सराइतांना धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. किरकोळ वादातून पिस्तूल उगारून गोळीबार केला जातो. अशा घटनांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; तसेच गोळीबार, कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटनांमुळे शहराची प्रतिमा डागाळली आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.

परराज्यांतून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुलांची विक्री केली जाते. पोलिसांनी यापूर्वी कारवाई करून अशा टोळ्यांना अटक केली होती. मात्र, त्यानंतरही शहरात देशी बनावटीची पिस्तुले सहजतेने उपलब्ध होतात. बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच वर्षांत पुणे पोलिसांनी सराइतांकडून एकूण ४५० पिस्तुले जप्त केली. या प्रकरणात ५७१ जणांना अटक करण्यात आली. या आकडेवारीतून पुण्यात पिस्तूल मिरवण्याची हौस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोयता गँग, गोळीबाराच्या घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला बट्टा लागला आहे. हा बट्टा पुसण्यासाठी आता पोलिसांनी बेकायदारीत्या पिस्तूल बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई केल्यास निश्चित जरब बसेल, तसेच गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rahul.khaladkar@expressindia.com