पुणे : गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधाची विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून अटक केली. बाबूभाई उर्फ अल्लाउद्दीन लस्कर (रा. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी ऑक्सिटॉसीन या ओैषधाची निर्मिती; तसेच त्याचे वितरण करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीला अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलीस ठाणे; तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) पकडले होते.

पोलिसांच्या पथकाने ऑक्सिटॉसीन ओैषधांचा ५३ लाख ५२ हजारांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजित सुधांशु जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदिनीनपूर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोन्डल (वय २२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपूरकूर, मंडाल, २४ परगाना, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली होती. लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आरोपी ऑक्सिटॉसीन ओैषधाची निर्मिती करत होते.

हेही वाचा : सलग तिसऱ्या दिवशी पुणे ठरले राज्यातील सर्वांत थंड हवामानाचे शहर

या टोळीचा मुख्य सूत्रधार बाबूभाई लस्कर पसार झाला होता. तो मुंब्रा परिसरात असल्याची महिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथून अटक केली. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, सुजित वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधे, सचिन माळवे, विशाल दळवी, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा : विश्लेषण: केंद्रानं केला भारतातील ५७६ मातृभाषांचा सर्व्हे; काय आहेत निष्कर्ष? वाचा सविस्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्सिटॉसीनचा वापर कशासाठी?

ऑक्सिटॉसीन ओैषध हार्मोन आहे. प्रसूती सुरळीत पार पाडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने ऑक्सिटॉसीन ओैषधाचा वापर केला जातो. मात्र, ऑक्सिटॉसीन औषधाचा वापर गाई, म्हशींचे दूध वाढीसाठी केला जातो. गाई, म्हशींना ऑक्सिटॉसीन ओैषध दिल्यानंतर दूध जास्त प्रमाणात येते. मात्र, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो. दूध पिल्यास अशक्तपणा, दृष्टिविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेस रक्तस्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार तसेच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.