पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राज्यातील दोन शाळांसह देशभरातील वीस शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गैरप्रकारांसंदर्भात केलेल्या पडताळणीनंतर सीबीएसईने कारवाईचा निर्णय घेतला आहे.

सीबीएसईच्या संलग्नता आणि परीक्षा उपविधीमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी, निकषांनुसार सीबीएसई शाळा चालवल्या जातात, की नाही या बाबत केलेल्या तपासणीमध्ये काही शाळांमध्ये बनावट विद्यार्थ्यांचा प्रकार उघडकीस आला. तर काही शाळा अपात्र उमेदवारांना प्रवेश मिळवून देण्यासाठी विविध गैरप्रकार करत असल्याचे, नोंदी दुरुस्त केल्या जात नसल्याचे समोर आले. त्यामुळे सीबीएसईने दोषी शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा…पिंपरी : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी… परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम

संलग्नता रद्द केलेल्या शाळांमध्ये दिल्लीतील पाच, उत्तर प्रदेशातील तीन, राजस्थान, छत्तीसगढ, महाराष्ट्र, केरळमधील दोन, उत्तराखंड, आसाम, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीरमधील एक अशा वीस शाळा आहेत. त्यात पुण्यातील पायोनियर पब्लिक स्कूल आणि ठाण्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. तर पंजाब, दिल्ली, आसाममधील प्रत्येक एक या प्रमाणे तीन शाळांचा दर्जा कमी करण्यात आला आहे.