पुणे: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. या घटनेला जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. पण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाण्याचे टाळत आले आहे.
तर दुसर्या बाजूला त्यांचे आजारपण यामुळे धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूरच होते. पण आता धनंजय मुंडे हे विपश्यना केंद्रात गेल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे या पुणे दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना धनंजय मुंडे बाबत विचारले असता त्या म्हणाल्या, त्यांनी (धनंजय मुंडे) योग्य पर्याय निवडला आहे.त्यांना मनःशांती मिळेल अशी भूमिका त्यांनी मांडली.
लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय सर्व बाजूंचा विचार करूनच घेतला : पंकजा मुंडे
लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडताना दिसतोय, त्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हाला काय दिसतय त्याबाबत मला काही माहिती नाही. कोणत्याही प्रकारची काटकसर करण्याच कारण नाही. तसेच मोठ मोठ्या प्रकल्पांना आणि योजनांना निधी दिला जात आहे. त्याच बरोबर लाडकी बहीण योजना राबविण्यापूर्वी सर्व आर्थिक बाजूचा विचार करूनच निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविण्याच काम करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘त्या’ बाबत गृहविभाग निर्णय घेईल : पंकजा मुंडे
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.त्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. वैष्णवी सारखी वेळ कोणत्याही मुलीवर कधीच येऊ नये, पण तिला न्याय मिळाला पाहिजे, तसेच या प्रकरणाची चौकशी कोणत्या विभागामार्फत केली जावी,याबाबत गृह विभाग निर्णय घेईल,अशी भूमिका त्यांनी मांडली.