पुणे : जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, तसेच उत्तराखंडमधील पहाडी फळांचा हंगाम सुरू झाला आहे. प्लम, पिच, चेरी, ॲप्रिकॉट या फळांची आवक सुरू झाली आहे. नासपती, पिअर या फळांची आवक पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. या फळांच्या हंगामाचा कालावधी साधारणपणे एक महिन्यापर्यंत सुरू असतो. विविध आजारांवर गुणकारी अशी ओळख असल्याने पहाडी फळांना ग्राहकांकडून मागणीदेखील चांगली असून, पहाडी फळांचे भावही चढे आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारात महिनाभर पहाडी भागांतील विविध फळे बाजारात उपलब्ध राहणार आहेत. हिमाचल प्रदेशातील चेरीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. पुढील आठवडभरात हिमाचल प्रदेशातील आवक सुरू राहणार आहे. काश्मीरमधील चेरीचा हंगाम महिनाभर सुरू राहणार आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील व्यपारी, श्री गुरुदेव दत्त फ्रुट एजन्सीचे सत्यजित सुयोग झेंडे यांनी दिली.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहाडी फळांची आवक होत असते. ही फळे नाशवंत आहेत. बाजारात सध्या हिमाचल प्रदेश, काश्मीरमधून या फळांची आवक होत आहे. ही फळे वाहनांसह विमानमार्गे मार्केट यार्डात विक्रीस पाठविली जातात. विमानाने एकाच दिवसात फळे बाजारात येतात. त्यामुळे ती ताजी असतात. वाहतूक खर्च जास्त असल्याने रेल्वे, रस्त्यामार्गे पाठविण्यात येणाऱ्या फळांपेक्षा दर तेजीत असतात, असे त्यांनी सांगितले.

करवंद, जांभळाला ‘रानमेवा’ म्हटले जाते. त्याप्रमाणे उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर भागातील पिअर, नासपती, प्लम, पिच ही फळे ‘रानमेवा’ म्हणून ओळखली जातात. पहाडी फळांचा हंगाम जूनअखेरीस संपेल.- सत्यजित सुयोग झेंडे, फळांचे व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

पहाडी फळांचे किलोचे दर

प्लम – १५० ते २०० रुपये

पिच- १२५ ते १५० रुपये

चेरी -३५० ते ४०० रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲप्रिकॉट – १०० ते १२५ रुपये