लोकसत्ता प्रतिनिधी पुणे: हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला बुधवारी ‘रेड अलर्ट’ दिला आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, सातारा, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला बुधवारी रेड अलर्ट आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यासह कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून, सतर्क राहण्याचे निर्देश हवामान विभागाने दिले आहेत. आणखी वाचा-कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट चंद्रपुरात २४० मिमीची नोंद विदर्भात मंगळवारी दिवसभरात पावसाची संततधार सुरू होती. चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी झाली असून, दिवसभरात २४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. वर्ध्यात ३१ गडचिरोलीत १४ आणि नागपुरात १२ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात उस्मानाबादमध्ये १६ तर उदगीरमध्ये (लातूर) १४ मिमीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात फारसा पाऊस झाला नाही. महाबळेश्वरात ७९ तर कोल्हापुरात ४, सांगली, सातारा ३ आणि सोलापुरात ९ मिमी पाऊस झाला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस सुरू होता. अलिबागमध्ये १०, डहाणूत २७, कुलाब्यात २५, सांताक्रुजमध्ये १६ आणि रत्नागिरीत १४ मिमी पाऊस पडला आहे.