वाकड, पिंपळे निलखच्या गृहसंस्थांमधील नागरिकांचा तक्रारींचा पाढा
पिंपरी : जागोजागी टँकरमाफियांचा सुळसुळाट झाला असून ते सोसायटय़ांमधील रहिवाशांची लूट करत असल्याचा आरोप वाकडला आयोजित एका बैठकीत करण्यात आला. महापौर माई ढोरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असता, पाण्याची समस्या सोडवण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.
सातत्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावणाऱ्या वाकड आणि पिंपळे निलख परिसरातील सोसायटय़ांमधील रहिवाशांची बैठक महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत झाली. स्थानिक नगरसेवक संदीप कस्पटे, ममता गायकवाड, विनायक गायकवाड, संतोष ढोरे, सोसायटी फेडरेशनचे सुदेश राजे, सचिन लोंढे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार आदी उपस्थित होते. या वेळी रहिवाशांनी पाण्याच्या विषयावरून तक्रारींचा पाढा सुरू केला.
सोसायटय़ांना कधीच नियमित, पुरेसे आणि उच्च दाबाने पाणी मिळत नाही. पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने टँकरने पाणी आणावे लागते. त्याचा फायदा टँकरमाफिया उठवतात. थेरगावात सोसायटय़ांना एका टँकरमागे १५० रुपये तर पिंपळे निलख आणि वाकड येथील सोसायटय़ांना ७५० रुपये आकारले जातात. कित्येक दिवसांपासून टँकरमाफियांकडून सुरू असलेली लूट आता असह्य़ झाली आहे. पाणीगळतीमुळे समान पाणीपुरवठा करता येत नसल्याची सबब पालिकेकडून सातत्याने सांगितली जाते. मात्र, ही गळती रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याची नाराजी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे आणि प्रवीण लडकत यांना धारेवर धरले. त्यानंतर, त्यांनी वाकड, पिंपळे निलख येथील पाणीपुरवठा येत्या १० महिन्यांत सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली.
महावितरणाकडून दुर्घटनेची प्रतीक्षा?
सोसायटय़ांमधील महावितरणचे डीपी, उघडे असणाऱ्या विजेच्या तारा, विजेचा लपंडाव आदींमुळे त्रस्त असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. वारंवार सांगूनही उपाययोजना केली जात नाही. महावितरण एखादी दुर्घटना होण्याच्या प्रतीक्षेत आहे का, असा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी या संदर्भातील कामे सुरू असून सुरक्षिततेची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.