वीजचोरांविरुद्ध उघडलेली मोहीम त्याचप्रमाणे वितरण व्यवस्थेत होणारी विजेची गळती थांबविण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पाश्र्वभूमीवर ‘महावितरण’च्या पुणे विभागामध्ये वीज वितरणातील हानीचे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे. पुणे विभागात ९.६१ टक्के वीज हानी आहे. त्या पाठोपाठ कल्याण विभागात ९.९८ टक्के वीज हानी असून, सर्वाधिक २२.८२ टक्के वीज हानी नांदेड विभागात आहे.
‘महावितरण’ची सरासरी वीज वितरण हानीही यंदा कमी झाली असून, ही हानी सध्या १४.६७ टक्क्य़ांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वी सरासरी वीज वितरण हानी १७.२८ टक्क्य़ांपर्यंत होती. विशेष म्हणजे ‘महावितरण’च्या स्थापनेच्या वेळी म्हणजेच २००५ मध्ये ही हानी ३१.७२ टक्क्य़ांवर होती. राज्य वीज नियामक आयोगाने विजेची वितरण हानी कमी करण्याचे उद्दिष्ट ‘महावितरण’ला दिले होते. त्यानुसार ही हानी कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या.
 मीटर वाचनातील अनियमितता शोधण्यासाठी राज्यभरात महिलांच्या दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे वीजचोरी रोखण्याच्या दृष्टीने राज्यभरात भरारी पथके व सहा स्वतंत्र पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून वीजचोरीच्या विरोधात कठोर भूमिका घेत मोहिमा राबविण्यात आल्या. वीज वितरणातील घट शोधण्यावरही भर देण्यात आला असून, ऊर्जा लेखांकनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्या. वितरण रोहित्रांना मीटर बसविण्यात आले. त्याचप्रमाणे फिडरवरही मीटर बसविण्यात आले. त्यातून विजेचा हिशेब ठेवणे शक्य झाले.
मागील काही वर्षांपासून पुणे विभागात सर्वात कमी विजेची हानी आहे. त्यानुसार २०१२-२०१३ या वर्षांतही पुणे विभागामध्ये राज्यात सर्वात कमी वीज वितरण हानी नोंदविली गेली. मात्र, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, नांदेड या भागामध्ये अद्यापही मोठय़ा प्रमाणावर वीज वितरण हानी असल्याचे दिसते आहे.

विभागानुसार वीज वितरण हानी

अमरावती (१८.३३), औरंगाबाद (१८.७१), भांडूप (१२.८२), जळगाव (२१.३३), कल्याण (९.९८), कोकण (१६.७७), कोल्हापूर (१४.२९), लातूर (२२.००), नागपूर शहर (१३.३४), नागपूर (१०.८१), नांदेड (२२.८२), नाशिक (१५.५१), पुणे (९.६१), बारामती (१५.३८).