पिंपरी : भक्तिरसात न्हाऊन निघालेली अलंकापुरी, इंद्रायणीच्या दोन्ही तटांवर जमलेला वैष्णवांचा मेळा, खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ज्ञानोबा माउलीचा अखंड जयघोष, टाळ-मृदगांचा टिपेला पोहोचलेला गजर अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने गुरुवारी देऊळवाड्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या माउली नामाच्या अखंड जयघोषाने अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली. पालखीचा पहिला मुक्काम गांधीवाडा आजोळघरात असणार आहे.
आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी हजारो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. हरिनामासह ज्ञानोबा, तुकारामांचा अखंड जयघोष सुरु आहे. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती, गोपाळपुरा, विश्रांतवाड परिसर वारकऱ्यांनी दुमदुमून गेला आहे.
पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश तथा आळंदी देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र महाजन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार बाबाजी काळे, देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी वीणामंडपात किर्तन झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दर्शनबारी सुरु होती. सायंकाळी पाच ते सात दरम्यान माउलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक झाली. त्यानंतर प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. सर्व दिंड्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे सरकत होत्या. वीणा-टाळ-मृदंगाच्या गजराने माउली तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता.
रात्री साडेसातनंतर पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. माउलींच्या समाधीवर मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार घालण्यात आला. श्रीगुरू हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माउली संस्थानातर्फे श्रींची आरती झाली. वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या.
चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. सर्वांच्या मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माउली माउली’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळ्याची रंगत वाढतच गेली. सोहळा सुरू असताना दिंड्यांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माउलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आणण्यात आले. अश्वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. अश्व महाद्वारातून बाहेर पडताच मंदिरातील दिंड्या मंदिराबाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
पालखी मंदिरातून बाहेर निघताच उपस्थित वारकरी, भक्तांनी एकच जल्लोष सुरू केला. पालखी खांद्यावर घेण्यासाठी वारकरी, भाविकांची झुंबड उडाली होती. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
चौकट
आल्हाददायक वातावरणामुळे आनंदाला उधाण
दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या. या आल्हाददायक वातावरणात राज्यभरातून आलेल्या वैष्णवांनी दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत तीर्थस्नान केले. इंद्रायणीचे दोन्ही काठ ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात मंत्रमुग्ध झाले होते.
इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीला पूर आला आहे. दरम्यान, नदीपात्रात स्नान करताना एक वारकरी वाहून गेला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने झाडाला अडकलेल्या वारकऱ्याला त्वरित बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. अमोल तुकाराम राठोड (वय ३८, रा.यवतमाळ) असे वाचलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पाणी वाढल्याने नदीकाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
गुरुवार असल्याने यंदा उशिरा प्रस्थान
दरवर्षी पालखीचे सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होत असते. यंदा मात्र पालखी प्रस्थान सोहळा गुरुवारी आला. दर गुरुवारी सुर्यास्तानंतर माउलींची मंदिरात पालखी मिरवणूक निघत असते. यावर्षीही मिरवणूक झाल्यानंतर प्रस्थान सोहळा झाला. त्यामुळे प्रस्थानाला उशिर झाला. रात्री साडे दहाच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. शेकडो पोलीस रस्त्यावर थांबून सुरक्षिततेची काळजी घेत होते. पालखी सोहळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांचीही नेमणूक केली. प्रस्थान सोहळ्यानंतर माउलींची पालखी आळंदीतच आजोळघरी मुक्कामी राहते. त्यामुळे माउलींचे मंदिर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट, तसेच संपूर्ण आळंदी शहरातच पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.