प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे अंतर्गत मोशीतील उपबाजार समितीचा १९८२ पासून सुरू झालेला प्रवास २०१३ मध्ये संपला. तब्बल ३० वर्षांच्या कालावधीनंतर मुहूर्त मिळालेल्या या बाजार समितीत अजूनही सुविधांची वानवा का आहे, याचे सर्वानाच कोडे पडले आहे.
प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेची १९५७ ला स्थापना झाली. मात्र १९५९ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गुलटेकडीला मुख्य बाजार असून खडकी व िपपरी-चिंचवडला यापूर्वीच उपबाजार समित्या निर्माण करण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणी, वाढती लोकसंख्या व व्याप्ती मोठय़ा प्रमाणात होत असलेली आवक आदींचा विचार करून मोशीत नव्याने उपबाजार तयार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १५ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आला. नव्या वास्तूत व्यावसायिक १५९ गाळे व ४२ गोदामे आहेत. भाजीपाला, कांदा-बटाटा, फळांसाठी स्वतंत्र विभाग आहे. मात्र, या बाजारात बऱ्याच उणिवा असल्याचे उद्घाटनाच्याच दिवशी तेही मंत्रिमहोदयांच्या समोरच उघड झाले होते. शेतीमाल ठेवण्यासाठी शीतगृहे नाहीत, येथे येणाऱ्या नागरिकांसाठी शौचालये नाहीत, वजनकाटे नाहीत, उन-पावसात बसण्याची सोयीस्कर जागा नाही, अशा अनेक त्रुटी खुद्द अजितदादांनीच निदर्शनास आणून दिल्या. चांगले काम केल्याचे प्रशस्तिपत्र देऊन ठेकेदारांचा सत्कार करण्यात आला असला तरी अजितदादांनी खरेच चांगले काम झाले आहे का, असे तुमच्या मनाला विचारा, असे सांगत सावधच विधान केले होते. मोशीच्या बाजार समितीला ३० वर्षे लागतातच कशी, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर बाजार समित्यांमध्ये बऱ्याच समस्या एकेक करून समोर उभ्या ठाकत असल्याचे दिसून येत आहे.