पुणे : बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प एका पाऊल पुढे सरकला असला, तरीही या प्रकल्पाला अद्याप पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा आहे. जलसंपदा विभागाकडून राज्य सरकारला प्रस्ताव दिल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने कामाला सुरुवात होण्यासही विलंब होत आहे.

खडकवासला ते फुरसंगी बोगदा हा खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंतचा मुठा उजवा कालवा बंद करून त्याऐवजी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. पाण्याची बचत करणे, पर्यावरणाची हानी टाळणे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाचीही तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बोगद्यासाठी सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान २८ किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक जलसंपदा विभागाकडून तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता. या समितीने मध्यंतरी त्या अहवालात किरकोळ त्रुटी काढल्या होत्या. त्या दुरुस्त करून दिल्यानंतर समितीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला होता. हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी आता राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.

या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच, पाणीगळती कमी होऊन शेतीलादेखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाकडून या प्रस्तावाला विलंबाने सहमती दर्शविण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाकडून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला केंद्र शासनाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. येत्या काही दिवसांमध्ये ती मिळेल. त्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल. – श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.