निवडणूक जवळ आली, की मोठ्या जोमाने कामाला लागणारा पक्ष कोणता, असे विचारल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (मनसे) बोट दाखविले जाते. पक्षांतर्गत गटबाजीने एकेक करून अनेक सवंगड्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने कमकुवत झालेल्या आणि सुस्तावलेपणा आलेल्या या पक्षात बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान पदाधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवून आणि काही पदे नव्याने तयार करून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे ‘इंजिन’ जोरात चालविण्याचा निर्धार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पडझडीनंतर हे पदाधिकारी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नव्या सवंगड्यांच्या शोधात निघाले असल्याने त्या निमित्ताने का होईना ‘मनसे’ जागी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मनसेचे पुण्यात पारंपरिक मतदार आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षाची धरसोड वृत्ती आणि अस्तित्व दाखवून देण्यात सातत्याचा अभाव यामुळे पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस खालावला. स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे अनेक नेत्यांनी पक्षांतर करून मनसेला ‘राम राम’ केला. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी कमकुवत झाली. अशा परिस्थितीत पक्षवाढीसाठी प्रत्येक निवडणूक लढण्याचेही कष्ट पक्षाने घेतलेले दिसत नाहीत.

सुरुवातीच्या काळात लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले. २००९ च्या निवडणुकीत रणजित शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी ७५,९३० मते घेऊन चांगली लढत दिली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक पायगुडे उमेदवार होते. या दोन निवडणुकांनंतर गेल्या दहा वर्षांत लोकसभा निवडणूक न लढविण्याचे धोरण पक्षाने ठरविले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घेऊन प्रचारात भाग घेतला. मात्र, पक्षाचा उमेदवार उभा केला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षाची शहरातील ताकद गेल्या दहा वर्षांत या पक्षाला आजमावता आलेली नाही.

विधानसभा निवडणुकीमध्येही प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात मनसेने सातत्य ठेवलेले नाही. २००९ च्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे निवडून आले होते. त्यानंतर पुण्यातून एकही आमदार निवडून आलेला नाही. २००९ मध्ये कोथरूडमधून किशोर शिंदे, कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, हडपसरमधून वसंत मोरे, शिवाजीनगरमधून रणजित शिरोळे आणि पर्वतीतून आशिष चिटणीस हे उमेदवार होते. या सर्वांचा पराभव झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासलामधून राजाभाऊ लायगुडे, कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, कोथरूडमधून किशोर शिंदे, पर्वतीतून जयराज लांडगे, हडपसरमधून नाना भानगिरे आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून अजय तायडे यांनी निवडणूक लढविली. मात्र, एकाही ठिकाणी यश आले नाही.

मनसेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोजक्याच ठिकाणी उमेदवार उभे केल्याचे दिसून येते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे यांनी निवडणूक लढविली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर, खडकवासल्यामधून मयूरेश वांजळे यांनी निवडणूक लढविली. या दोन्ही निवडणुकांत मनसेचा फारसा निभाव लागला नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीमध्येही मनसेची ताकद क्षीण होत गेलेली दिसून येते. पक्षस्थापनेनंतर २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या २०१२ च्या निवडणुकीत मनसेला लक्षणीय यश मिळाले. त्या वेळी २९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे अवघे २ नगरसेवक निवडून येऊ शकले.

आता आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आता मनसे कामाला लागली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविली जाणार आहे. तसेच काही नवीन पदे निर्माण करून पक्षाला उभारी आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज ठाकरे नऊ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी पक्षात फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीस जेमतेम चार महिन्यांचा अवधी राहिला आहे. एवढ्या अल्पकालात पक्षाला ऊर्जितावस्था आणण्याचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर आहे. नवीन सवंगडी हेरून त्यांना पक्षात आणण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे. हे करताना पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याची कसरतही करावी लागणार आहे.

सध्या असलेल्या काही पदाधिकाऱ्यांबद्दल पक्षात नाराजीचे वातावरण आहे. त्यांच्याकडेच पुन्हा अतिरिक्त जबाबदारी सोपविल्यास पक्षवाढीऐवजी संघर्षाची चिन्हे अधिक आहेत. ‘मनसे’चा आजवरचा पुण्यातील प्रवास पाहिल्यास नवीन नेमणुका झाल्या, की गटबाजीला आणखी उधाण येते. अशा वेळी नाराजांना थोपविणे पक्षाच्या नाकी नऊ येते. आता तर बिनीचे अनेक शिलेदार पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षांत स्थिरस्थावर झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या निष्ठावंतांची मोट बांधून महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हानात्मक काम मनसेला करावे लागणार आहे. मात्र, अनेक दिवसांपासून थंडावलेल्या या पक्षाला उशिरा का होईना; जाग आली आहे, हेही नसे थोडके!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sujit.tambade@expressindia.com