पुणे : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) तयार केलेल्या नव्या पाठ्यक्रमासह इयत्ता पहिलीचे विद्यार्थी उद्या शाळेची पहिली पायरी चढतील. पुढे जाताना प्रत्येक इयत्तेत ते आता बदलांचे पहिले सोबती असतील. अनेक सुरुवातींचे असे पहिलेपण दप्तरात भरून आलेले हे विद्यार्थी, पाठ्यक्रमाचे अगदी पहिले अनुभव घेण्यासाठी आता सज्ज होत आहेत. एनईपी लागू होत असताना सीबीएसई पद्धत, हिंदी सक्ती, तिसरी भाषा अशा अडथळ्यांची शर्यत करून इथवर आला आहे. त्यामुळे धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच्या अपेक्षित बदलांची नांदी येत्या काळात घडणार का, याची उत्तरे औत्सुक्याची असणार आहेत.
संकलित मूल्यमापन चाचणीमुळे यंदा पहिल्यांदाच शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू होत्या. तसेच, ‘एनईपी’नुसार राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई’ पद्धत लागू करण्याची चर्चा होती. त्यात प्रामुख्याने गणित आणि विज्ञानासाठी ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम स्वीकारण्याचे ठरवण्यात आले. सीबीएसई शाळांच्या धर्तीवर राज्यातील शाळाही १ एप्रिलपासून सुरू करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, यंदा त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.
इयत्ता पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू करताना तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र विरोध झाला. त्यानंतर शालेय शिक्षणणंत्री दादा भुसे यांनी हिंदीची सक्ती न करता तिसऱ्या भाषेसाठी अन्य भारतीय भाषांचे पर्याय देण्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, पहिलीपासून तिसरी भाषाच नको, या आग्रही भूमिकेमुळे तिसऱ्या भाषेचा निर्णय स्थगित करण्याचे जाहीर करूनही त्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने अद्यापही प्रसिद्ध केलला नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, आजपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर भागांत शाळा सुरू होत आहेत. इयत्ता पहिलीला नव्या अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. यंदा विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरच गणवेश, मोजे, बूट मिळणार असल्याने गणवेश गोंधळ टळणे अपेक्षित आहे.
नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भाषिक, जीवनकौशल्ये वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनीही तयारी केली आहे. त्यात शाळांतील वर्गखोल्याची स्वच्छता, सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजण्यासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत.
प्रवेशोत्सवाची उत्सुकता
‘पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. एकूण ४७३ लोकप्रतिनिधी, २०५ अधिकारी शाळांना भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सर्व योजनांची माहिती असलेल्या घडीपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. तसेच, मोफत वितरणासाठी पाठ्यपुस्तकांच्या ७ लाख २८ हजार ५८५ प्रती वितरित करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.