पुणे : कर्नाटकमधील बळ्ळारीतील महिलेला प्रसूतीनंतर मानसिक आजार जडला. या आजारामुळे ती घरातून निघून जात असे. तिचा पती तिला शोधून घरी आणत असे. एके दिवशी ती गेली; परंतु परतलीच नाही. अखेर २२ वर्षांनी तिची मुलांशी भेट घडविण्यात येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आणि श्रद्धा फाउंडेशनला यश आले आहे.

बळ्ळारीतून घरातून निघून गेलेली ही महिला ऑक्टोबर २०१६ मध्ये इंदापूरमध्ये पोहोचली. ती हातात काठी घेऊन फिरत होती आणि दिसेल त्याच्यावर काठी उगारत होती. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. नंतर शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशाने तिला येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोरुग्णालयात उपचार घेऊन ही महिला बरी झाली. तिला दोन वर्षांपूर्वी कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशनमध्ये पुनर्वसनासाठी पाठविण्यात आले. फाउंडेशनने तिची केवळ जबाबदारीच घेतली नाही, तर संस्थेतील कार्यकर्त्यांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका घेऊन तिच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी कर्नाटकातील बळ्ळारी गाठले. तिच्या गावात जाऊन तेथील लोकांना तिचे छायाचित्र दाखवून कुटुंबाची चौकशी सुरू केली. तसेच तिचे छायाचित्र स्थानिक कार्यकर्त्यांना दिले. याची माहिती त्या महिलेच्या मुलाला मिळाली. मात्र, तोपर्यंत श्रद्धा फाउंडेशनची रुग्णवाहिका निघून गेली होती. मुलाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रुग्णवाहिकेवरील मोबाइल क्रमांकाच्या आधारे फाउंडेशनशी संपर्क साधला. त्या वेळी त्याची आई फाउंडेशनमध्ये असल्याचे समजले. त्याने तातडीने दोन बहिणींना सोबत घेऊन २७ मे रोजी श्रद्धा फाउंडेशन गाठले. तेथे आईला पाहिल्यानंतर या भावंडांना अश्रू अनावर झाले.

आतापर्यंत ७३ रुग्णांचे पुनर्वसन

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृद्ध व अपंग कक्षातील मनोरुग्णतज्ज्ञ परिचारिका मंगल बांगर, समाजसेविका अधीक्षक फरिदा शेख, बसप्पा बिराजदार यांनी कन्नड भाषेत या महिलेशी संवाद साधून तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्या गावाची माहिती मिळण्यास मदत झाली. श्रद्धा फाउंडेशनचे डॉ. भरत वाटवानी आणि येरवडा प्रादेशिक रुग्णालय यांच्या रुग्णांना घरी पाठवण्याच्या मोहिमेला चांगले यश मिळत आहे. आतापर्यंत ७३ रुग्णांचे राज्यात आणि परराज्यांत पुनर्वसन करण्यात आले आहे, असे मोहिमेचे समन्वयक भाऊसाहेब माने यांनी सांगितले.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात १५० रुग्ण दीर्घकालीन वास्तव्यास आहेत. या रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांकडे पुन्हा पाठविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी व समाजाने सहकार्य करण्याची गरज आहे.- डॉ. श्रीनिवास कोलोड, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी दोन वर्षांची असताना या महिलेला मानसिक आजार जडला. प्रसूतीच्या काळातील ताणतणाव आणि घरातील अज्ञानामुळे तिला उपचार घेता आले नाहीत. वेळीच मानसिक आजाराचे निदान होऊन उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. – डॉ. क्षमा राठोड, वरिष्ठ मनोविकृती तज्ज्ञ