पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रस्त्यांना पावसामुळे नद्यांचे रूप आल्याचे चित्र आहे. यामुळे हिंजवडी आयटी पार्क नव्हे, तर वॉटर पार्क अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) अनोखी मागणी केली आहे. आयटी पार्कमध्ये जलवाहतूक सेवा सुरू करावी, असे त्यांनी म्हटले आहे .आयटी पार्कमध्ये शनिवारी (ता. ७) सकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर तेथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

या पाण्यातून वाट काढणाऱ्या वाहनांच्या चित्रफिती समाज माध्यमांवर टाकण्यात आल्या आहेत. यावर आमदार रोहित पवार म्हणाले की हे एखादं वॉटर पार्क नाही तर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क आहे. अर्ध्या तासाच्या पावसात हिंजवडी आयटी पार्क जलमय झालं. यंदाचा हवामान खात्याचा समाधानकारक पावसाचा अंदाज बघता हिंजवडीत बोटिंग सर्विसची पर्यायी व्यवस्था उभारण्यास एमआयडीसीला अडचण नसावी. चार-चार तास वीज नसते, संध्याकाळची वाहतूक कोंडी तीन-चार तास खाते, राज्यातल्या सर्वांत मोठ्या आयटी पार्कचा हा विकसित चेहरा बघून गुंतवणूकदार येतील का? आहेत त्या कंपन्या इथे थांबतील का? असे प्रश्न पडतात. लाखो लोकांना रोजगार, शिक्षण देणाऱ्या आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावं, ही विनंती!

सुळे यांची उपाययोजनांची मागणी

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंजवडीमधील टप्पा २ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे, की नाही, अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज असतानाही ती झालेली नाहीत. एमआयडीसीने यात तातडीने लक्ष घालून भविष्यात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटीयन्सचे ताशेरे

‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने (एफआयटीई) या मुद्द्यावरून सरकारी यंत्रणांना जाब विचारला आहे. ‘एफआयटीई’चे म्हटले आहे की, ‘पावसाचे पाणी तुंबल्यामुळे ‘आयटी पार्क’चे ‘वॉटर पार्क’ झाले. पाणी तुंबलेल्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी केली. त्यावेळी सांडपाणी वाहिन्या पूर्णपणे चिखल, गवत, झाडे, बांधकामाचे साहित्य, मेट्रोच्या बांधकामाचे साहित्य यामुळे तुंबलेल्या आढळून आल्या. आयटी पार्कमधील पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे. आयटी पार्कमध्ये बांधकामे वाढली असून, नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. पावसाचे पाणी तुंबू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.’