पुणे : पायाभूत टप्प्यावरील शिक्षणासाठी भारतीय भाषांतील कवितांच्या संकलनासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘बालपणीच्या कविता’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार या कवितासंग्रहासाठी राज्यातून बालसाहित्यातील मराठी, इंग्रजीसह अन्य भाषांतील कविता सादर करण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी देशभरातील २२ भाषांतील लोकसाहित्य, बालसाहित्यातील वयोगटानुसार कविता, लोकगीते, स्वलिखित कविता, जुन्या कविता, गीते संबंधित लेखकांच्या नावासह एकत्रित करण्यासाठी बालपणीच्या कविता (बालपन की कविताएँ) हा उपक्रम केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि पायाभूत साक्षरता विभागाकडून राबवण्यात येत आहे. त्यानुसार ३ ते ६, ६ ते ७ (इयत्ता पहिली), ७ ते ८ (इयत्ता दुसरी) असा वयोगट निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक भाषेतून कवितांचे अनेक संग्रह तयार होऊ शकतील.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच, अंतिम झालेल्या प्रवेशिकांना निवड समितीद्वारे पारितोषिक देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक, पालक, कवी, लेखक, शिक्षणप्रेमी यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवून शक्य तितक्या स्वलिखित कविता, गाणी, लोकसाहित्यात लोकप्रिय असलेल्या कविता लेखकांच्या नावासह सादर करण्यासाठी आवाहन करावे. कविता पाठवण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अधिक माहिती https://innovateindia.mygov.in/baalpan-ki-kavita/ या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.