पुणे : ‘आता विरोध म्हणून विरोध केला जात नाही, तर तुमच्या अभिव्यक्तीवर वेगळ्याच शक्ती काम करतात. बोलायलाही धाडस करावे लागते आहे, असे आजूबाजूचे वातावरण झाले आहे. सध्या आपण अघोषित आणीबाणीच्या काळात वावरतो आहोत,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘बेलवलकर सांस्कृतिक मंचा’च्या वतीने ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान’ पुरस्कार कुलकर्णी यांच्या हस्ते अभिनेते प्रसाद ओक यांना देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अभिनेते सुमीत राघवन, समीर बेलवलकर, गार्गी फुले या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात राजेश दामले यांनी प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधला.

कुलकर्णी म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर जाहीर कार्यक्रमात त्यांच्याच उपस्थितीत टीका करण्याचे धाडस निळू फुले यांनी दाखवले होते. सरकार विरोधात बोलू शकणाऱ्या निळू फुले, डॉ. लागू अशा धाडसी माणसांची सध्या अनुपस्थिती जाणवते. निळू फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याने आमच्या पिढीवर गारूड केले होते. फुले यांनी नव्या पिढीला मोठा आदर्श घालून दिला.’ राघवन म्हणाले, ‘हाडाचा कार्यकर्ता असलेले निळू फुले सर्वोत्कृष्ट नट होते. अत्यंत बिकट परिस्थितीतून त्यांनी मोठे नाव केले. मूल्ये रसातळाला जाण्याच्या काळात निळू फुले यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. सध्या आदर्शच उरलेले नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाइक, शेअर आणि फॉलो करण्यात पिढी रमली आहे. त्यांच्यासमोर समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या माणसांची उदाहरणे यायला हवीत.’ गार्गी फुले यांनी प्रास्ताविक केले. दामले यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणाऱ्या निळे फुले नावाच्या विद्यापीठाने अनेक संस्कार केले. त्यांनी माझ्यातल्या अभिनेत्याला पैलू पाडण्याचे काम केले. निळू फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही मोठी सन्मानाची बाब आहे. – प्रसाद ओक, अभिनेता