पुणे : राज्यातील व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस, बीबीएम), संगणकशास्त्र पदवी (बीसीए) अभ्यासक्रमाच्या जागा यंदाही रिक्त राहण्याची चिन्हे आहेत. या अभ्यासक्रमाच्या समाइक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) उपलब्ध जागांपेक्षा कमीच नोंदणी झाली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८५ टक्के विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रम त्यांच्या अखत्यारित घेतले. त्यानंतर प्रवेश परीक्षा सीईटी सेलद्वारे घेण्यात आली. गेल्या वर्षी पहिले वर्ष असल्याने दोन वेळा सीईटी घेण्यात आली होती. सीईटी सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी पहिल्या सीईटीला ५६ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांपैकी ४८ हजार २१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसऱ्या सीईटीला नोंदणी केलेल्या ४९ हजार २२५ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर यंदाच्या सीईटीसाठी ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी ६१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे.

बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमांच्या राज्यभरात एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीही पुरेशा प्रतिसादाअभावी जागा रिक्त राहिल्या होत्या. उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी झालेली नोंदणी, ८५ टक्केच विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा अशा कारणांमुळे यंदाही या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहण्याची चिन्हे आहेत.

एमबीए, एमसीए ‘सीईटी’ची स्थिती

व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए, एमएमएस), संगणकशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमसीए) अभ्यासक्रमांसाठीही सीईटी सेलकडून सीईटी घेण्यात आली. गेल्या वर्षी १ लाख ५२ हजार ९११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १ लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी म्हणजे ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर यंदा नोंदणी केलेल्या १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी, म्हणजेच ८२ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष परीक्षा दिली. एमसीए सीईटीसाठी गेल्या वर्षी नोंदणी केलेल्या ३९ हजार ९६५ विद्यार्थ्यांपैकी ९६ टक्के, म्हणजे ३८ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा ५६ हजार २५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ५३ हजार २२ विद्यार्थ्यांनी, म्हणजेच ९४ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीईटीला कमी प्रतिसाद मिळाल्याने जागा रिक्त राहण्याचा धोका आहे. शहरी भागातील नामांकित महाविद्यालयांतील ८५ टक्क्यांपर्यंत जागा भरू शकतात. मात्र, ग्रामीण भागातील महाविद्यालयातील जागा अधिक प्रमाणात रिक्त राहतील. ही परिस्थिती लक्षात घेता पुरवणी सीईटी घ्यावी किंवा प्रवेशप्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी महाविद्यालयाच्या स्तरावर सीईटी घेऊन प्रवेश देण्याची मुभा द्यावी. – प्रा. श्यामकांत देशमुख, कार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी