दुसऱ्या बँकेत नोकरी स्वीकारणाऱ्या रुपी बँकेच्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाची रक्कम मिळावी यासाठीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बँक कर्मचारी संघाचे सरचिटणीस आणि रुपी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य विद्याधर अनास्कर यांनी रविवारी सांगितले. अन्य बँकांमध्ये चांगली संधी मिळत असेल तर त्याचा अवश्य विचार करा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
बँक कर्मचारी संघातर्फे आयोजित कर्मचारी मेळाव्यात विद्याधर अनास्कर यांनी बँकेच्या विलीनीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. संघाचे अध्यक्ष राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर यांच्यासह पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
रुपी बँकेचे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी काही कर्मचाऱ्यांनी केली. त्यासंदर्भात अनास्कर म्हणाले,‘‘सहकारी बँकेची स्थापना सहकार कायद्यांतर्गत होते. तर, राष्ट्रीयीकृत बँकेला कंपनी कायदा लागू होतो. त्यामुळे सहकारी बँकेचे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये विलीनीकरण होण्याची प्रक्रिया किती किचकट आहे हे आपण सुवर्ण सहकारी बँकेच्या विलीनीकरणाच्या उदाहरणातून अनुभवले आहे. त्यामुळे सहकाराचा पैसा सहकारी बँकेमध्येच असला पाहिजे ही भूमिका आहे. सध्या तरी राष्ट्रीयीकृत बँकेने नाही, तर केवळ सारस्वत को-ऑप. बँकेनेच विलीनीकरणाविषयीचा प्रस्ताव दिला आहे. रुपी बँकेचे विलीनीकरण होणार यावर विश्वास ठेवा. बँकेच्या ३५ पैकी ३२ शाखा कार्यगत नफ्यामध्ये (ऑपरेटिंग प्रॉफिट) आहेत, ही बाब विलीनीकरणाची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. रिझव्र्ह बँकेची टीम आणि सारस्वत बँकेची ‘डय़ू डिलिजन्स’ची टीम त्याविषयीचा अभ्यास करीत आहे.
रुपी बँकेचे विलीनीकरण करून घेणाऱ्या बँकेने सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे यासाठी संघाचा प्रयत्न असेल. रिझव्र्ह बँकेचे आर्थिक र्निबध आल्यानंतर १५० कर्मचाऱ्यांनी बँकेतून दुसरीकडे नोकरी पत्करली आहे. तर, आगामी पाच वर्षांत ४०० कर्मचारी निवृत्त होत आहेत ही बाबदेखील ध्यानात घ्यावी लागेल. त्यामुळे ज्यांना नव्या बँकेमध्ये सामावून घेता येणार नाही अशांपैकी काहींना स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारता येणे शक्य होईल, असे सांगून अनास्कर म्हणाले, शहरामध्ये ६० बँका आहेत. या बँकांना दरवर्षी किमान एका शाखेला परवानगी ही मिळतेच. त्यामुळे कुटुंबाचा विचार करून चांगली संधी मिळत असेल तर, दुसऱ्या बँकेमध्ये जाण्याच्या पर्यायाचा अवश्य विचार करणे योग्य ठरेल.
रजा रोखीकरण होत नसल्यामुळे काही कर्मचारी संधी असूनही दुसऱ्या बँकेत जाऊ शकत नाहीत, ही बाब कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्याविषयीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही अनास्कर यांनी सांगितले.