‘अलौकिक नीतिमत्तेची क्षमाशीलता’ हे राजेंद्र भोसले यांचे पत्र (लोकमानस,  २८ फेब्रु.) लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पराभवास सामोरे जाणे पसंत केले, पण त्यांच्या अनुयायांनी रचलेला विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या खुनाचा कट त्यांच्या अनुयायांना विश्वासात घेऊन व त्यांचे मनपरिवर्तन करून टाळला! ही उच्च दर्जाची नैतिकताच होय.
लोकसत्तेचा त्याच दिवसाचा अंक वाचत असताना पहिल्या पानावर, मराठी भाषदिनी राज्यातील दोन प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी साजरा केलेल्या ‘राडा दिनाची’ बातमी मनाला चटका देऊन गेली. एकाच राज्यातल्या नेतृत्वाच्या किती भिन्न, परस्परविरोधी कथा आहेत या, असे वाटले!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही राजकीय व्यासपीठांवरून अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या, पण या दोघांचे संबंध मैत्रीचे होते आणि राजकारणापलीकडचे ते नाते त्यांनी जपले. या पाश्र्वभूमीवर, त्या दोघांच्या पुतण्यांमध्ये जुंपलेली लढाई मराठी माणसाला खटकणारच. ही राडे संस्कृती दोघाही नेत्यांनी थांबवावी, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार कधी झाला ते समजणारही नाही.
अमितकुमार पं. देसाई

आयपीएल आणि दुष्काळ यांचा संबंध काय ?
राज ठाकरे जालन्यातही राष्ट्रवादीवर बरसले. एक राजकीय पक्ष म्हणून तो त्यांचा हक्कही आहे. भाषण करताना केवळ भावनिक मुद्दे न आणता ते त्यांनी वास्तवाशीही तपासून पाहायला हवेत. एवढा मोठा दुष्काळ असताना आयपीएल क्रिकेट सामने खेळवण्याला त्यांचा विरोध आहे. मुळात त्यांच्या मताप्रमाणे दुष्काळ हा मानवनिर्मित आहे आणि तोही राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे.
या दुष्काळाला तोंड देण्यासाठी पाण्याची, चाराछावण्यांची आणि दुष्काळपीडिताना आíथक आणि इतर आनुषंगिक मदत करण्याची गरज आहे. आयपीएल न खेळवून ती थोडीच भागणार आहे? महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता दु:खात असताना अशा उत्सवी खेळांना परवानगी देऊ नये, ही त्यांची भावना असेल तर तीही योग्य नाही, कारण आयपीएल हा आता खेळ राहिला नसून तो एक उद्योग बनला आहे, त्यातून राज्यालाही घसघशीत महसूल मिळतो. मिळणारा पसा दुष्काळग्रस्तांसाठी उपयोगात आणावा, अशी भूमिका अधिक वास्तववादी ठरू शकते.
 सागर पाटील , कोल्हापूर</p>

शकुनाची नासाडी!
शकुन आणि अंधश्रद्धा याचे एक उदाहरण आणि त्यामुळे होणारे आपल्या देशाचे प्रचंड नुकसान बघा..  एकटय़ा मुंबई शहरात १०० विभाग आणि प्रत्येक विभागात साधारण १०० हॉटेले (यामध्ये मोठी, छोटी हॉटेले तसेच चहाच्या टपऱ्या धरून). म्हणजे एकूण संख्या १०,०००. यातील प्रत्येक हॉटेलवाला दररोज सकाळी पहिला चहा व एक ग्लास पाणी रस्यावर ओततो. म्हणजे एकटय़ा मुंबईत दररोज १०,००० कप चहा व १०,००० ग्लास पाणी (किमान चार हजार लिटर पाणी) रस्त्यावर ओतले जाते. ही अन्नाची, पर्यायाने संपत्तीची नासाडी आहे.
 यावर मला सुचलेला इलाज म्हणजे प्रत्येक हॉटेलवाल्याने सकाळी एका गिऱ्हाईकास एक चहा प्रसाद म्हणून पाजावा. त्यामुळे चहा कोणाच्या तरी मुखी पडेल व त्याला देवही पावेल (असला तर).
अर्थात ही गोष्ट सहजासहजी पटणार नाही व अंगवळणी तर पडणारच नाही. त्यासाठी समाजातील, राजकारणातील आणि अध्यात्म मार्गातील दादा, बापू, अण्णा या सर्वाना जनजागरण करावे लागेल.. किंवा वृत्तपत्रे आणि चित्रवाणी वाहिन्यांना पुढे यावे लागेल!  
अनंतराव जोशी, मुलुंड

रेल्वे अर्थसंकल्पात ‘संकल्प’ कुठचा?  
केंद्रीय रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी अत्यंत सपक असा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर केला. कर्तव्य, कल्पकता व कौशल्य यांचा अभाव असलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून अंमलबजावणी न झालेल्या अनेक घोषणांचा वर्षांव करणारा, असे या अर्थसंकल्पाचे मूल्यमापन करता येईल. विरोधकांनी त्यावर टीका केली, यातही काही आश्चर्य नाही, पण काही समर्थक पक्षांनीही यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यूपीएचा एक महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसही या नाराज पक्षांत आहे. मात्र या नाराजीत तळमळ किंवा कळकळ किती? एवढीच जर रेल्वे प्रवाशांविषयी तळमळ असती तर सरकारमधून कधीच बाहेर पडून सामान्य माणसाची बाजू राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली असती. कॅमेऱ्यासमोर त्यांचे बोलणे, हे मग नाटक ठरले नसते.
महसूल हवा म्हणून लावा कर, वाढवा कर, करा भाडेवाढ, असा अत्यंत सोपा उपाय या सरकारने सुरू केला आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाला तर अर्थ-संकल्प तरी का म्हणावे, असा प्रश्न आहे. संकल्प म्हणजे नियोजित काळात ठरवून केलेले निश्चित काम, पण यात तर असा एकही संकल्प दिसत नाही.. सारेच अनिश्चित! नाही म्हणायला इंधन अधिभार लावून प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचा संकल्प दिसतो आहे.  
अनिरुद्ध बर्वे, कल्याण.

तरुण राजकारण्यांनी काय ठरवले आहे?
राज ठाकरे आणि अंकुश काकडे यांच्यातील आव्हान आणि प्रतिआव्हान यामुळे ७ मार्च रोजी पुण्यात काय होणार याचे एक भयानक काल्पनिक चित्र निर्माण झाले होते, पण  शरद पवारांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या आदेशामुळे वातावरण थंड होण्यास मदत झाली हे बरे झाले. पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला असेल.  शरद पवारांना ज्या दिवंगत यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र मानले जाते. त्या यशवंतरावांनी विरोधकांच्या टीका टिप्पणींना आणि आरोप प्रत्यारोपांना ज्या धीरोदात्तपणे तोंड दिले त्याची आठवण अशा प्रसंगी होते.
राज्य करताना सूडाची भावना ठेवून काम करू नये अशी अपेक्षा माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी १९७७ साली जनता पार्टीच्या नेत्यांकडून केली होती, ती अपेक्षा दुर्लक्षित झाल्याने केवळ अडीच वर्षांतच मोरारजी सरकार कोसळले होते हा इतिहास फार जुना नाही. आजच्या तरुण राजकारण्यांनी दीर्घकाळ काम करून समाजाची उन्नती करायचीच नाही असे तर ठरवले नाही ना? राज ठाकरे हे कोणाचे ऐकणार नाहीत; पण अजित पवारांचे काय ? इतरांचे नाही, पण आपल्या काकांचे तरी त्यांनी ऐकावे अशी अपेक्षा करावी का?
श्रीनिवास जोशी, डोंबिवली

गुणांचे काय करावे?
विजया राजाध्यक्ष यांचे लोकमानस मधील ‘एक मार्क कापला’ हे पत्र वाचले. मराठीच्या प्राध्यापिका आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून मार्क (पक्षी : गुण) या शब्दाचा वापर खटकला.
तसेच ‘अव्याहतपणे’ या वापराबाबतसुद्धा. हे क्रियाविशेषण आहे. अव्याहत म्हणणे अचूक आहे. तुमचे काय करावे?
दिलीप चावरे

असे ‘औचित्य’ साधणे तरी टाळा
मराठी भाषा दिन म्हणून भाषेला अभिमानाने गौरवणाऱ्या महाराष्ट्रात त्याच दिवशी दोघा मराठी पक्षांनी भांडावे यासारखी दुर्दैवी घटना नाही.मनसे आणि राष्ट्रवादी या पक्षांनी मराठी भाषा दिनाचे ‘औचित्य साधून’ अनेक ठिकाणी दगडफेक केली, यातून अनेक लोक जखमी झाले, जनजीवन विस्कळीत झाले.. आधीच महाराष्ट्रातील जनते समोर दुष्काळ, महागाई असे प्रश्न असतांना या प्रश्नाचे निराकरण कसे करता येईल याकडे लक्ष देण्याऐवजी एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. यातून भरडली जाते ती सर्व सामान्य जनता.
सुहास वैद्य, डोंबिवली