भटक्या जातीजमातीतील सगळ्यांनाच समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचं आहे. त्यासाठी मिळेल ती संधी त्यांना हवी आहे…

दारं किलकिली होणं या शब्दाचा अर्थ अंधाराशी संबंधित की उजेडाशी? अंधाऱ्या कोपऱ्यात कवडसं आलं असं कथा कादंबरीतलं वाक्य सामाजिक पातळीवर प्रत्यक्षात दिसतं तेव्हा खूप सारे चेहरे समोर येत राहतात. काही आश्वासक, पुढे जाण्याची आस असणारे. त्यात बहुतांशी जाती भटक्या. जातीय उतरंडीमध्ये ज्यांचं जगणंच अमान्य या श्रेणीतील. तिच्या पायात घुंगरं आणि त्याच्या पायात चाळ. फडावर ढोलकी आणि पोतराजाच्या समोर हलगी वाजते. पुरुषाला रिझविण्यासाठी किंवा पुरुषी वृत्तीला कुरवाळण्यासाठी तमाशा. पोतराजाच्या डोक्यावर धर्मसंस्कृतीचं जोखड. आता जग बदलू लागलं आहे. काही जागा, काही रकाने भरू लागले आहेत. पुरुष आणि धर्म या दोन्ही सत्ता मात्र कायम आहेत. या दोन्ही सत्तास्थानांवर आता माध्यमांची चलती आहे. बदलांचा वेगही वाढतो आहे. नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं एका दमात सांगणाऱ्या मुलास नाहकच संस्कारी वगैरे समजलं जायचं आणि जातंही. करमाळा तालुक्यातील नेर्ला नावाच्या गावातील शाळा पाहायला जाताना, सूचना आली ‘येथील मुलांना ‘संपूर्ण’ नाव विचारायचं नाही.’ असं का, हा प्रश्न विचारायच्या आधी सांगण्यात आलं – ‘कोल्हाट्याचं पोर’ या पुस्तकाचे लेखक किशोर शांताबाई काळे यांच्या आईचं हे मूळ गाव. या गावात मुलीचं असणं पालकांसाठी आनंदाचं. म्हणजे ज्या घरातील मुलगी तरुण आणि अधिक सुंदर ते घर अधिक श्रीमंत. सौंदर्य ढळलं, तारुण्य ओसरलं की घराला अवकळा. अगदी बिजागरी दुरुस्त करण्याचं कामही पुढं ढकललं जातं. जगण्यातील सुविधांचा आणि सौंदर्यांचा बंध हा असा. ज्या घरात सुविधा अधिक त्या घरात घुंगराच्या वारशाची चलती. या गावाचा काही वर्षांपूर्वीचा कच्चा रस्ता आता सिमेंटचा झाला आहे. गावातील ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. जुना श्रीमंतीचा निकष आता हळूहळू बदलू लागला आहे. आता मुलीचं नाचगाणं हा श्रीमंतीचा निकष राहिला नाही. आता मुलींनी शिकायला हवं हा संदेश हळूहळू रुजू लागला आहे. यातील काही मुली शिकून डॉक्टर, इंजिनीअर झाल्या आहेत. काही जणी अधिकारी झाल्या आहेत. काही जणींनी शिकून अगदी भारतीय प्रशासकीय सेवेपर्यंत धडक मारली आहे. प्रेरणा बदलल्या आहेत. तमाशाच्या फडात जाणाऱ्या कोल्हाटी समाजातील मुलींची संख्या कमी झाली आहे. नेर्ला आता बदलू लागलं आहे. तरुण मुलं आता शेती करू लागली आहेत. शेतीतून आणि अन्य स्रोतातून पैसे उपलब्ध होत असल्याने कोल्हाटी समाजात सकारात्मक बदल होऊ लागले आहेत.

नारायणगाव जत्रेत तमाशाचं पुढील वर्षीचं नियोजन ठरतं. या वर्षी पाऊस जरासा लवकर सुरू झाला. त्यामुळे तमाशा फडातील मंडळींना आता सुट्टी लागली आहे. पुढील चार महिने आता बंदिस्त थिएटरमधील संगीतबारीचे. पण कोल्हाटी समाजातील मुलींऐवजी आता पारधी समाजातील मुली तमाशाच्या फडात दिसू लागल्या आहेत. मुस्लीम समाजातील पुरुष आणि पारधी समाजातील मुली यांची संख्या तमाशाच्या फडात वाढली आहे. शोषण व्यवस्था ही अशी असते. एक समाज शिक्षण घेऊन पुढे जातो, त्या रिक्त जागी जात उतरंडीतील खालच्या पायरीचा माणूस जातो. आपलं शोषण कमी व्हावं म्हणून धडपडणाऱ्या भटक्या समाजातील एखादी रूढी बदलली तरी बरेच नवे बदल होतात. पण धर्मवृत्ती तशीच राहते. असे बदल केवळ पैशाभोवताली केंद्रित असतील तर त्यातील संघर्ष कमी असतो. कोल्हाटी समाजातील मुलींची जागा पारधी समाजाने घेणं हा बदल अगदी तसा. जामखेड, परीते, शेवगाव, पाथर्डी, अहिल्यानगर या भागात तमाशाचे फड उभे करणाऱ्यांची संख्या अधिक. तुलनेने दुष्काळी भागात फड उभारले जातात आणि सधन सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात संगीत बारी आणि तमाशाचे फड चालतात.

या फडात काम करणाऱ्या सगळ्या मुलींच्या हातात समाजमाध्यम आलं आहे. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मकही परिणाम दिसू लागले आहेत. ज्यांच्या पायात घुंगरू आहेत, अशा मुलींचं इन्स्टाग्राम अकाउंट जोरात आहे. त्यातून पुरुष अधिक आक्रमक आणि आसक्त व्हावा, अशी रचना. संख्या वाढली तर तमाशा चालेल हे या मुलींना कोणी सांगावं लागत नाही. तमाशातील मुलींच्या ‘रील्स’ पाहणारा एक वर्ग ग्रामीण भागात आहे. गौतमी पाटील हे एक उदाहरण. आभासी जगात पुरुष हा असा वर्चस्ववादी. दहाएक वर्षापूर्वी पोतराजनं ‘व्हिजिटिंग कार्ड’ काढलं होतं. १९९० नंतर आपलं दिसणं, आपलं काम, आपलं मूळ जगाला ओरडून सांगावं लागतं, याचं भान येऊ लागलं होतं. चिवरी नावाच्या देवीच्या मंदिराभोवती राहणाऱ्या नागुराव शिंदे या पोतराजाला हे कळू लागलं. आता मुलांना शिकवायला हवं, हेही उमजलं. त्यांचा मुलगा प्रशांत शिंदे यालाही पोतराज व्हावं लागलं. पण तो शिकतो आहे. राखलेले केस घेऊन तो शाळेत जायचा. आता तो पदवीधर झाला आहे. पण पायात चाळ, समोर हलगी, तोंडाला शेंदूर लावून तो महालक्ष्मीची स्थापना असेल तिथे देवीची कवनं म्हणतो. असंही पदवीधर होऊन उपयोग नाही हे त्याला कळलं आणि त्यानं स्वत:चं यू-ट्यूब चॅनल काढलं आहे. एक हजार ‘सबस्क्रायबर’ असल्याचं त्याला कौतुक आहे. नागुराव आणि प्रशांत आता पोतराज महासंघ नावाच्या संघटनेत सहभागी झाले आहेत. एका कार्यक्रमाचे किमान पाच हजार रुपये असा त्यांचा दर आहे. पूर्वी म्हणजे १९९३ च्या भूकंपानंतर नागुराव शिंदे यांना घरकुल मिळालं. आता मंदिरांची संख्या वाढू लागली आहे. धार्मिक कार्यक्रमातून मिळणारा पैसा वाढला आहे. नागुरावच्या घरात आता ‘वॉटर कूलर’ आला आहे. घरात स्वयंपाकगृहात कडप्पाच्या ओट्याच्या खाली आता गॅसची टाकी आली आहे. घरात भांडीकुंडी वाढली आहेत. लोखंडी कपाट आलं आहे. घराची फरशी बदलली आहे. तीही पांढरी शाहबादी नाही. तर गुळगुळीत काळी-पांढरी डिझाइनची. घर पत्र्याचं आहे, पण ‘टीव्ही’ आहे. नागुरावपर्यंत मध्यमवर्गीय सुविधा मिळू लागल्या आहेत. दोन्ही मुलं पदवीधर झाली आहेत. मुलीचं लग्न झालं आहे. आता नागुराव आणि प्रशांत यांचं आता बरं चाललं आहे. रूढीचा कल्पक वापर करण्याचं नवंकौशल्य प्रशांत शिंदे यांनी शिकून घेतलं आहे. हा बदल अगदी छोट्याशा गावातील आहे. तो सर्वव्यापी आणि सार्वत्रिक आहे, असं नाही. पण बदलाचा हा वेग अधिक आहे.

गेल्या दहा वर्षांत रूढी बदलून आयुष्याला नवी दिशा देणारेही अनेक जण आहेत. शिवाचा अवतार म्हणून देवीबरोबर पट लावायचा. डोक्यावर केस राखायचे. पोतराज म्हणून अब्रान घालणारा, पायात चाळ बांधणारा, अंगात देवीचं वारं आलं तर महिलेला शांत करणारा, शहरातील चौकात स्वत:च्या अंगावर आसूड चालवणारा. अंधश्रद्धांच्या रस्त्यावर चालणारा पोतराज तुम्हालाही दिसत असेल. ते सारं बदललं आहे, असं नाही. पण अधिक पैसे मिळविण्याचं कौशल्य ही मंडळी शिकू लागली आहेत. हे चांगलं की वाईट, ठरविण्यासाठी वेळ कोणाला आहे? पण काही वर्षांपूर्वी ही रूढी मोडावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. मारुती बनसोडे नावाच्या एका तरुण कार्यकर्त्यांने नरेंद्र दाभोलकरांच्या भाषणांमुळे प्रेरित होऊन डोक्यावरचे केस कापण्याची चळवळच सुरू केली होती. त्या काळात केस कापणारा एक जण वाहनचालक झाला आहे. दुसरा पुण्यात मॉलमध्ये काम करतो आहे. अनेक जण बदलले. मारुतीने स्वत:ची स्वयंसेवी संस्था काढली. पण तो आता पोतराजांसाठी काम करत नाही. त्याला ‘एफसीआरए’चा निधी मिळतो. पसारा वाढला आणि मूळ काम काहीसं मागं पडलं. रूढी मोडून एक वर्ग पुढे गेल्यावर नव्या रिकाम्या जागांवर स्थान मिळवत नवा वर्ग शहरात येऊन बसला आहे. बदल घडताहेत, सुधारणांचा एक नवा पट मांडला जात आहे.

नांदेड जिल्ह्यात आई – वडिलांच्या मृत्यूनंतर पारधी समाजातील चार मुलं अनाथ झाली. ती पुढे तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडीमध्ये आली. यातील एक तरुण, अर्जुन चव्हाण आता डॉक्टर झाला आहे. तो पारधी समाजातील पहिला डॉक्टर. आता पारधी समाजातील मुलींना पोलीस होण्याच्या स्वप्नांनी अक्षरश: पछाडलं आहे. आपल्या आई – वडिलांवर ज्या व्यवसायातील व्यक्तींनी अन्याय केला तो व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतो, हे भान या काळात जन्माला आलं आणि अनेक मुली हवालदार म्हणून रुजू होऊ लागल्या. पण काहींना रस्ता सापडला नाही. त्या तमाशाच्या फडात पोहोचल्या. अशा बदलांचे दस्तऐवज मात्र तसे फारसे कोणी नोंदवत नाही. या भटक्या जातींचे गटदेखील अधिक घट्ट झाले आहेत. असे का, याचे विश्लेषण करायला वेळ कोणाला नाही. पण आहे हे असं आहे. आई तमाशाच्या फडावर अदाकारी करायची तेव्हा अरुण हरिबाई जाधव आष्टी तालुक्यातील हनुमंतवाडी येथे शिकायचे. तो काळ संघर्षाचा होता. १९९० नंतर त्यांनी मराठी, इतिहास या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पशुवैद्याक चिकित्साही ते शिकले. आता ते वकील आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी वसतिगृह चालवतात. गोळीबारात आई-वडील गमावलेली आणि नाचणाऱ्या महिलांची अशी १०० हून अधिक मुलं ते सांभाळतात. त्यांच्या मते भटक्यांमध्ये बदलाचा कालखंड १९९५ नंतरचा. डोंबारी, गोपाळ, कोल्हाटी या मंडळींतील पुरुष कसरत दाखवत. आता अशा भटक्यांमध्ये फक्त डोंबारी काही प्रमाणात दिसतात. अन्य जातींनी काही रिकाम्या जागा भरायला सुरुवात केली आहे. काही स्थिरावले आहेत. अरुण जाधव यांच्यासारखी मंडळी या सगळ्या प्रक्रियेत या मुलांना मदत करत आहेत. नव्या बांधणीच्या कालखंडात नव्या बदलांबरोबर व्यसनाधीनता वाढली आहे. या व्यसनात पान, तंबाखू, गुटखा हे तर आहेतच. शिवाय एक नवा बदल आहे – तो माध्यमांतून सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील चलचित्रांचा. तो सार्वत्रिक आहे. संपर्काची नवी माध्यमे हातात आल्यानंतर हा समाजही बावचळून गेला आहे. साऱ्या भटक्या जातीतील व्यक्तींना मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी ते मिळतील त्या जागी बसू लागले आहेत. जागा बदलण्याचा एक प्रयोग सकारात्मक असला तरी त्याची व्याप्ती फार काही पुढे सरकत नाही. आपलं समाज कल्याण ‘टेंडर’ मध्ये अडकलं आहे. रिकाम्या जागा भरल्या जात आहेत. त्याला त्याची गती आहे. भटक्यांच्या जगात शासन – प्रशासन तसं नावालाच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhas.sardeshmukh@expressindia.com