महाराष्ट्राला साक्षेपी विचारवंतांची एक फार मोठी परंपरा आहे. त्या परंपरेतील एक मानले जाणारे संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रामायण महाभारताचे व्यासंगी दाजी पणशीकर (९२ वर्षे) यांचे ६ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
१९३४ मध्ये जन्मलेल्या दाजी पणशीकर यांचे बालपण मुंबईच्या ठाकूरद्वार परिसरात गेले. आयुष्यभर त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती, वैदिक परंपरा, रामायण, महाभारत, संतसाहित्य, क्रांतिकारकांचे तसेच प्रतिभासंपन्न कलाकारांचे जीवनकार्य याचा अभ्यास केला. दाजींच्या अभ्यासाला स्वतंत्र चिंतनशीलतेचे, चिकित्सेचे परिमाण होते. कोणाला काय वाटेल, याचा विचार न करता जे सत्य आहे ते परखडपणे व्यक्त करायचे, हीच त्यांची सदैव भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या काही लेखमाला वादळी ठरल्या.
१९६०- ७०च्या दशकात महाराष्ट्राच्या ललित साहित्य क्षेत्रात महाभारतातील कर्ण या व्यक्तिमत्त्वाबद्दल होत असलेली मांडणी त्यांना अस्वस्थ करत होती. त्यातूनच ‘कर्ण खरा कोण होता?’ ही लेखमाला जन्माला आली. प्रतिक्रियात्मक भावनेतून ती निर्माण झाली असली तरी, दाजींनी त्यात ठाम मते मांडली. यात, मूळ व्यासांच्या महाभारतातलेच संदर्भ, दाखले उद्धृत करूनच दाजींनी आपले प्रतिपादन केले होते.
महाभारताचा स्वतंत्र अन्वयार्थ लावत असताना महाभारतातल्या सगळ्या घटनांच्या मुळाशी ‘सूड’ ही एक सूत्रभावना असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्या चिंतनातूनच ‘महाभारत एक सुडाचा प्रवास’, ही लेखमाला आली. या प्रवासाचे मूळ परशुरामांपासून असल्याची मांडणी अनेकांना अस्वस्थ करून गेली.
त्यानंतरही अपरिचित रामायण, कथामृतम, शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे विवेचन अशा अनेक लेखमाला त्यांनी लिहिल्या. नंतर त्या पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या. किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या निमित्ताने प्रतिभासंपन्न कलाकार आणि त्याची प्रतिभा या संदर्भात दाजींनी लिहिलेला चिंतनात्मक चरित्र ग्रंथ हा एकमात्र अपवाद ठरला.
दाजींच्या या अभ्यासाचे मूळ, त्यांना मिळालेल्या पणशीकर घराण्याच्या वारशातच होते. दाजींचे आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांनी ४० हून अधिक वर्षे, त्या वेळच्या निर्णय सागर प्रेसमध्ये हिंदू धर्म, संस्कृती, संतसाहित्य, वैदिक वाङ्मयविषयीच्या शेकडो ग्रंथांचे शुद्धीकरण, प्रमाणीकरण आणि संपादन केले. हे सर्व ग्रंथ आज जगभरात भारतविद्या किंवा प्राच्यविद्याचे अभ्यासक आणि संशोधक विश्वासार्ह प्रत म्हणून वापरतात.
दाजींचे वडील विष्णुशास्त्री पणशीकर हे व्याकरण तज्ज्ञ होते, विविध प्रकाशकांचे धार्मिक ग्रंथ त्यांच्याकडे त्याकाळी तपासण्यासाठी येत. दाजींनी त्यांचे मामा आणि गुरू श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांच्याकडे राहून गुरुकुल पद्धतीने विविध विषयांचे ज्ञान प्राप्त केले. खरे तर, ‘बोलणे’, हाच दाजींचा खरा पिंड. त्यांनी लेखमाला लिहिल्या, त्या कायम कुणाच्या तरी आग्रहावरून. पण बोलणे, आपल्याला असलेली माहिती दुसऱ्याला सांगणे, आपले विचार मुद्देसूदपणे मांडणे, हेच त्यांचे जणू जीवनकार्य होते. समोर हजारोंचा प्रेक्षक वर्ग असो वा नसो, ऐकणारा भेटला की त्या-त्या वेळच्या विषयानुसार त्यांच्या वक्तृत्वाचा ओघ सुरू होई, आणि ऐकणाऱ्याला काय ऐकू आणि किती घेऊ असे होऊन जाई. ‘जगाच्या कल्याणा’ या भावनेतून सुरू असलेल्या ज्ञानयज्ञाची सांगता करून दाजी अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत.