राज्यकर्त्यांना शालेय पातळीवर पहिलीपासून हिंदी भाषेचे शिक्षण द्यायला सुरुवात करायची आहे. त्यामागची कारणे, हितसंबंध हा वेगळ्या चर्चेचा विषय. ती सुरू आहेच, पण बालशिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांचे याबाबतचे म्हणणे सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारे ठरावे…
निसर्गाच्या किमयेने, मुले आपली पहिली भाषा वेगाने आत्मसात करतात. बालकाच्या पहिल्या १८ ते २० महिन्यांच्या अवधीत मेंदूमधील भाषेचा प्रदेश कृतिशील होतो; आणि मग, आजूबाजूला ऐकायला मिळणारी भाषा मुले वेगाने शोषून घेतात. दोन – अडीच वर्षांची मुले, दिवसाला दहा शब्ददेखील आत्मसात करतात. अशाप्रकारे तिसऱ्या वयाला सुमारे ९०० शब्दांची बेगमी त्यांनी केलेली असते. आणि पाचव्या वयाच्या अखेरीस सुमारे तीन हजार इतके शब्द, त्यांनी आपल्या मेंदूच्या पेटीत साठविलेले असतात. ही पहिली भाषा हीच आपली विचारांची आणि कल्पना करण्याची भाषा मुख्यत: असते, भावना व्यक्त करण्याची आणि अर्थातच, इतरांशी संवाद करण्याची भाषा असते. लक्षात घेण्याची गोष्ट अशी की, या वयातील भाषा ही आपोआप आलेली, ‘आत्मसात’ केलेली आणि म्हणून कायमची मेंदूच्या पेटीत साठलेली भाषा असते; किंवा असेही म्हणता येईल, की ही कोणाकडून ‘शिकलेली’ भाषा नसते.
याच वयात बालकाच्या भोवतीच्या वातावरणात पहिलीइतकीच दुसरी एखादी भाषा असेल, तर तीही भाषा मुले अशीच नैसर्गिकरीत्या ‘आत्मसात’ करतील. मग, अशा परिस्थितीत या दोनही भाषा परिसरातल्या म्हणून, मुलांसाठी ‘पहिल्या’ भाषाच असतील.
येथेच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी, की नैसर्गिकरीत्या ‘आत्मसात होणारी पहिली भाषा’ आणि नंतरच्या काळात शाळेत जाऊन, ‘शिक्षकांच्या मदतीने कृत्रिमरीत्या शिकलेली दुसरी एखादी भाषा’ यात जमीन अस्मानाचा फरक असतो. पहिली आपोआप आलेली, आणि दुसरी कष्ट करून शिकत असलेली भाषा असते. भाषा ‘शिकणे’ ही अतिशय गुंतागुंतीची आणि कष्टप्रद प्रक्रिया असते. शिवाय पहिली भाषा अनेक भाषिक अनुभवांशी जोडलेली असते, त्यामुळे ती अर्थासहित आत्मसात होत असते. आणि दुसरी – तिसरी भाषा शिकताना, त्यांतील शब्दांचे अर्थ पहिल्या भाषेकरवी समजून घ्यावे लागतात.
हा नैसर्गिकतेने भाषा ‘आत्मसात’ होण्याचा कालावधी संपला की मग आयुष्यभरचा कालावधी असतो तो भाषा प्रयत्नपूर्वक शिकण्याचा. या काळात मनुष्य आपल्या आवडीनुसार कितीही भाषा प्रयत्नपूर्वक शिकू शकतो. हा इतका मोठा अवधी माणसाला उपलब्ध असल्यामुळे, अनेक भाषा अल्पवयातच शिकण्याचा आटापिटा करण्याचे कारण नाही. उलट, १०-१२ वयापर्यंत पहिली भाषा जेवढी प्रभावीपणे शिकता येईल, जेवढी ती शब्दसंग्रहाच्या दृष्टीने संपन्न होईल, तेवढी ती नंतरच्या काळात, शिकावयाच्या अन्य भाषांसाठी आधारभूत ठरेल. शिवाय, या वयापर्यंत बालकाचा झालेला शारीरिक आणि बौद्धिक विकास, हा मुलांना, भाषा शिकण्यासाठी अधिक परिपक्व, अधिक तयार करीत असतो. त्यामुळे, अर्थातच दुसरी किंवा तिसरी भाषा शिकण्यासाठी त्यांची बौद्धिक व मानसिक तयारी पुरेशी होत असते. म्हणजे, संपन्न भाषा + परिपक्वता = भाषिक बरोबरच बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि शारीरिक परिपक्वता.
पहिली भाषा शाळेत जाऊन शिकताना, तिची वृद्धी करताना, तिचा सराव करताना एकसंध आणि पुरेसा वेळ मिळावा लागतो. काही मुलांना वर्षाभरातच भाषेचे लेखन – वाचन जमते, तर काहींना दोन वर्षांचाही अवधी पुरत नाही. याचे पहिले कारण म्हणजे, शाळेतील तासिकांनुसार शिक्षकाकडून शिकत जाताना, एकूण वेळ वेगवेगळ्या विषयांत वाटला जात असल्यामुळे, प्रत्येक तासिकेचा वेळ मर्यादितच असतो. वेळ पुरेसा मिळत नाही. शिवाय याच काळात मुलांना विविधांगी भाषिक अनुभव यावे लागतात, परंतु हे सर्वच शाळांतून घडत नाही. त्यामुळे स्पष्ट चित्र असे दिसते की, बहुसंख्य विद्यार्थ्यांना पहिली निदान दोन पूर्ण वर्षे, भाषा शिकण्यासाठी कष्ट, वेळ आणि एकाग्रता या स्व-भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. यासाठी शाळांतून पहिली दोन वर्षे पहिल्या भाषेवर पूर्णत: लक्ष केंद्रित करावे लागते. या काळात मुले इतर विषयांचा व भाषांचा बोजा सोसू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की, पहिली भाषा ही ‘पहिली’ भाषा असल्याने तिच्यात भांडवल गुंतवणूक खूपच करावी लागते.
भाषा शिक्षणाचा क्रम कसा असावा?
सुरुवात | उंबरठा | |
पहिली भाषा | मराठी ६ वे वर्षं (पहिली) | ७ , ८ व ९ वर्षं (दुसरी, तिसरी व चौथी) |
दुसरी भाषा | इंग्रजी १० वे वर्षं (पाचवी) | १०-११ वर्षं (पाचवी, सहावी) |
तिसरी भाषा | हिंदी १२ वे वर्षं (सातवी) | १२ व १३ वर्षं (सातवी, आठवी) |
ज्या मुलांची पहिली भाषा ही प्रामुख्याने मराठी आहे, अशा मुलांना आपल्या शिकण्यात पूर्णत: ‘मराठीमय’ होण्याची गरज असते. केंद्र सरकारच्या खास पहिली भाषा- (मराठी) शिकण्यासाठीचा ‘निपुण’ हा प्रकल्प याच एकमेव हेतूने अमलात आणला जात आहे. मुलांची महाराष्ट्रातील आणि राष्ट्रातीलही आकडेवारी असे सांगते, की सुमारे ६५ टक्के मुलांना, दोन-तीन वर्षे झटापट करूनही, लेखन-वाचन (आणि गणनही) येत नाही. हे येणे अत्यावश्यक असते, कारण, त्यावरच मुलांची, इतर विषय शिकण्याची आणि एकूणच जीवनाची आधारशिला उभारली जात असते. त्यामुळे, शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला असा असतो, की
क) मुलांना पहिली दोन ते तीन वर्षे मराठीचा पाया रचण्यासाठी उपलब्ध करावीत, तरच पुढील विषय शिक्षण सोयीचे व सुकर होते. मुलांचे भाषिक मागासलेपण दूर होते.
ख) या कालावधीत इतर कुठल्याही विषयांचा बोजा मुलांना देऊ नये. त्यांनी, मुलांचा दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे मुलांना एकसंध आणि पुरेसा वेळ मिळू शकतो. आणि दुसरा म्हणजे, एकाच विषयावर लक्ष केंद्रित करता येते.
ग) पहिली भाषा पक्की करत असतानाच दुसरी आणि तिसरी भाषा, मुलांना सक्तीने शिकावयास लावली तर पहिल्या भाषेला द्यावयाचे श्रम, वेळ आणि एकाग्रता हे भांडवल अन्य भाषांबरोबर वाटले जाईल. असहनीय असा बोजा मुलांच्या मेंदूवर पडेल. या बोजाला शास्त्राच्या तांत्रिक भाषेत ‘आकलनाचे ओझे’ (Cognitive burden) असे म्हणतात. वाढत्या आकलन ओझ्यामुळे बालकाची आकलनक्षमताच दुर्बल होऊन, त्याचा इतर भाषांवर, इतर शिकावयाच्या विषयांवर परिणाम होतो. नीट आकलनाअभावी, मुलांचे सारे शिकणेच अडचणीत येते. शिकण्याचा वेगही मंद होतो, शिवाय अनेकांच्या बाबतीत, शिकण्याविषयीची नावड निर्माण होण्याची शक्यता असते.
घ) याचा पहिला आघात पहिल्या मराठी भाषेवर होऊन, तिच्या तयारीत मोठा अडथळा येईल. अन्य भाषा शिकण्याचे एकमेव साधन जे मराठी भाषा तेच दुबळे होऊन, इतर भाषा शिकण्याची पायवाटच अडथळ्यांची होते.
च) अर्थातच दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषेसही भांडवल कमी पडून त्या भाषा शिकण्याची सुरुवातही धडपणे होणार नाही. म्हणजे, तीनही भाषा नीटपणे आणि वेळेवर शिकल्या जाणार नाही. बालकांचा वेळही वाया जाईल आणि भाषांचे शिक्षणही अपुरे राहील.
छ) भाषा शिक्षणाचा एक क्रम सुज्ञांनी सुचविलेला आहे. पहिली भाषा हीच इतर भाषा शिकण्याचे एकमेव साधन असल्यामुळे, पहिली तीन वर्षे ही भाषा अशी पक्की व्हावी की, तिच्याकरवी पुढील काळात कोणतीही भाषा शिकता यावी.
ज) त्यामुळे आत्ताच्या भाषा संघर्षाच्या संबंधात आपल्याला असे म्हणता येईल की, वय वर्षे सहा, सात, आठ ही पहिल्या म्हणजे मराठी भाषेची तयारी व्हावी. नवव्या वर्षी दुसऱ्या भाषेची तोंडओळख आणि बोलायला देणे, शिकवणे हे व्हावे. ११व्या वर्षी म्हणजे पाचवीत असताना, या दुसऱ्या भाषेचे लेखन-वाचन शिकावे. त्यानंतर १२व्या वर्षापासून तिसऱ्या भाषेला मुलांच्या शिकण्यात स्थान द्यावे. नवीन शिक्षण धोरणात आणि नव्या अभ्यासक्रम आराखड्यातही हेच सुचविले आहे.
झ) भाषा शिकण्याचाही एक विशिष्ट क्रम आचरावा. आपण दुसरी आणि तिसरी भाषा मुलांपुढे आणू तेव्हा पहिले वर्ष, त्या भाषेत बोलायला शिकविले जावे आणि मग पुढील वर्षापासून लेखन-वाचनाकडे वळावे. येथे नियम असा आहे की, जी भाषा मुलांना बोलता येते त्या भाषेचे लेखन-वाचन त्यांना कमी कष्टाचे होते, कमी श्रमांत साध्य होते, आणि कमी वेळांतही होते.
अखेरीस, भाषा शिक्षणाचा अनुक्रम पाळला जाणे, हे मुलांवर कुठलाही बोजा न टाकता, सहजतेने शिकले जावे, यासाठी गरजेचे आहे. यात प्रत्येक भाषेसाठी कालावधीचा उंबरठा कुठे ओलांडायचा हे स्पष्ट होईल.
नव्या शिक्षण धोरणात, पहिली व दुसरी हा बालशिक्षणाचा भाग केला आहे. बालशिक्षण हे अनौपचारिक शिक्षणाचे क्षेत्र आहे. ते पुढील शिक्षणासाठी आणि जगण्यासाठी लागणाऱ्या क्षमतांच्या विकासाचे क्षेत्र आहे, ते स्वयंशिक्षणाचे क्षेत्र आहे. ते ताणरहित शिक्षणाचे क्षेत्र आहे. ते ‘पायाभूत’ क्षेत्र आहे. ते आनंदाने शिकण्याचे क्षेत्र आहे. ते पुढील शालेय शिक्षणाची तयारी करून देणारे क्षेत्र आहे. ते शिकण्याची आणि शाळेची आवड लावण्याचे क्षेत्र आहे. तेथे तीन भाषा सक्तीने- अट्टहासाने शिकवून, मुलांना कंटाळा बहाल करून, मुलांना शिकण्याची नावड निर्माण करून, मुलांच्या पहिल्या, नैसर्गिक मराठी भाषेला विकासपथावरून उखडून काढून, मुलांच्या शिक्षणाचे पायाभूत स्तरावरच नुकसान करून, पुढील शिक्षणाची सहज वाट विषय शिक्षणाच्या वाढत्या काट्यांनी सजविण्याचे असे ‘पहिली-दुसरी’चे क्षेत्र नाही.
महाराष्ट्र शासन, ही सारी प्रक्रियाच समजावून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. शासनातील धोरणकर्त्यांना, शास्त्रीयतेचे वावडे असावे, हे महाराष्ट्रातील शिक्षणाचे खरे दु:ख आहे.