वसई-विरार शहराला प्रतिदिन ४३ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार शहराला ३२६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असताना शहराला केवळ २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये २१ टक्के गळती होत असल्याने दररोज ४३  दशलक्ष लिटर्स पाणी कमी मिळत आहे. गळतीचे प्रमाण कमी करण्याचे काम सुरू असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन योजनांवर काम सुरू करण्यात आले आहे.

शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली असून पालिकेच्या नोंदीनुसार ती २४ लाखांहून अधिक आहे. सध्या शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २३० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत आहे. मात्र विविध कारणांमुळे पाण्याची गळती होत आहे. संध्या गळतीचे प्रमाण हे २१ टक्कय़ांवर आहे. त्यामुळे सुमारे ४३ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा कमी होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. ठिकठिकाणी होणारी गळती, जुन्या जलवाहिन्या यामुळे ही गळती होत असते. पुर्वी गळतीचे प्रमाण हे २९ टक्के होते. त्यानंतर पालिकेने ठिकठिकाणी दुरूस्तीची कामे केली होती. तेव्हा प्रमाण २१ टक्कय़ांवर आले. आता आणखी कामे करून गळतीचे प्रमाण आणखी कमी केले जाईल, असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले. सद्यस्थितीत  महानगरपालिकेला पाणी पुरविणाऱ्या तीनही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात ६३ टक्के म्हणजेच १७४. ९९१ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून हा वर्षभर पुरेल. तर उसगाव आणि पेल्हार धारणात अनुक्रमे ५८  आणि ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो तीन महिने पुरेल इतका आहे.  डहाणू येथील व्यती गावात हा पाणी प्रकल्प राबविण्यात आहे. परंतु हा प्रकल्प विविध प्रकारच्या अडचणीमुळे रखडला होता. हा प्रकल्प असून हा सूर्या जलशुद्धीकरण प्रकल्प एमएमआरडीए यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम हाती घेऊन वसईला १८० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय पालिकेने देहरजी धरणाचे काम हाती घेतले असून राजावली, तिल्हेह आणि सातिवली या ठिकाणी साठवण तलाव करण्याचे काम हाती घेतले आहे.

शहराला ३२६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज

शहराला दररोज २३० लिटर्स पाणी मिळत असले तरी प्रत्यक्षात ३२६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे, असे पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. शहरातील सर्व नागरिकांना पुरेसे पाणी हवे असेल तर आणखी ९६ दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

खोलसापाडा, देहरजी योजनेवर काम सुरू

भविष्यात वसई विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढणार आहे. एमएमआरडीएच्या विकास आराखडय़ानुसार शहरातील लोकसंख्या पुढील २० वर्षांंत ४५ लाख होणार आहे. त्यामुळे पालिकेने वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी विविध योजनांवर काम सुरू कऱ्ण्यात आले आहे. खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ चे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.  यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २३१ कोटी ९० लाख रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ या स्वतंत्र योजना आहेत. त्यातून पालिकेला ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. डहाणू व्यतीगाव येथील धरणातून १८० दललक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जाणार आहे.