प्रगत तंत्रज्ञानाने निर्माण झालेली अबोल संवाद माध्यमं कधी कधी क्षणार्धात चमत्कार घडवून आणतात आणि ‘मर्मबंधातली ठेव’ साकार होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे २३ जानेवारीला ब्राह्मण सेवा संघात साजरा झालेला संगीततीर्थ कै. विनायकबुवा काळे जन्मशताब्दी सोहळा. ठाण्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या श्रेष्ठांमधील एक अग्रगण्य नाव असलेल्या काळे गुरूजींच्या कन्या मंगलताई यांच्या मनात विचार येता क्षणी गुरूजींचे शिष्य विकास कात्रे यांनी कर्णोपकर्णी ही बातमी पोहोचवली आणि सगळ्या शिष्यांनी ही कल्पना उचलून धरली. आकाशाचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंबही जसं मनाला मोहून टाकतं तसंच सर्व शिष्यांच्या रक्तात झिरपलेल्या ‘विनायक’ सुरांच्या आविष्काराने कालचक्र जणू उलटं फिरवलं.
देशभक्त चाफेकर बंधूंचे भाचे असलेल्या काळे गुरूजींनी वडिलांचं बोट धरून ‘श्रवण’ भक्ती केली. गंगाप्रसाद पाठक, कृष्णराव शंकर पंडित व भूर्जीखाँ यांच्याकडून संगीताची तालीम घेतली. मैफलीचा गायक होण्यापेक्षा संगीतशिक्षक म्हणूनच ते संगीतक्षेत्रात रुजू झाले.
एक व्यक्ती, संगीतकार, प्रतिभावंत कवी, लेखक, कीर्तनकार, गुणग्राही रसिक, उत्तम व्यवस्थापक आणि शिष्यांचे चित्तापहारी गुरू असलेल्या गुरूजींची पांढरा सफेद कडक इस्त्रीचा झब्बा, पायजमा, त्यावर रुबाबदार नेहरू जाकीट, सोनेरी काडीचा चष्मा अशी छबी शेवटच्या श्वासापर्यंत आकर्षकच होती. स्वच्छता, टापटीप, नेटकेपणा, वक्तशीरपणा आणि वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असलेल्या गुरूजींच्या क्लासमध्ये प्रवेश मिळणं ही शिष्यांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बंदिश रचणारे, असे जगावेगळे लाड पुरवणारे ते एकमेवच असावेत.
तीन सत्रात सादर होणारी क्लासची गुरुपौर्णिमा हे ठाण्यातील एकमेव उदाहरण असेल. पूर्वनियोजित अत्यंत आखीवरेखीव, सूत्रबद्ध अशा या स्वरोत्सवातून गुरूजींचे व्यक्तिमत्त्वच प्रतिबिंबित होत असे. जन्मशताब्दी उत्सवाच्या रूपरेषेतून याचाच पुन:प्रत्यय आला. स्मरणिकेच्या माध्यमातून आठवणींना उजाळा आणि गायनवादनातून स्वरांची अभिव्यक्ती अशी शब्दसुरांची आदरांजली गुरूजींच्या समस्त शिष्यवर्गाने यानिमित्ताने अर्पण केली.
दशत्रय तालात बांधलेल्या कलावती रागातील शारदास्तवनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आकाशवाणी धारवाड केंद्रावरून गायन सादर करणारे बेळगावस्थित मुकुंद गोरे यांचा ‘मालन’ राग म्हणजे बेळगावी कुंदाच. सुटे सुटे स्वर वाजवले की सोवळं नेसून काय वाजवता, अशी गुरूजींची आठवण सोबत घेत विकास कात्रे यांनी गुरूजींना अभिप्रेत असलेल्या एकल संवादिनीवादनाचे पुरेपूर प्रतिबिंब दाखवणारा गुरूजींनी रचलेला कौस्तुभ राग वाजवला. गुरूजींच्या सांगण्यानुसार सातत्याने केलेल्या उत्तम रियाजाची फलश्रुती म्हणजे पंडित प्रकाश चिटणीस. हस्तस्पर्शाने संवादिनीवादनाच्या माध्यमातून ७।। मात्रा व ११ मात्रांच्या बंदिशी सादर करणारे एक जादूगारच. गुरूजींचे शास्त्रीय संगीताच्या प्रसाराचे व विद्यादानाचे कार्य पुढे ठेवणाऱ्या, सखोल, अभ्यासपूर्ण सादरीकरण करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका विदुला भागवत यांनी राग गोरख, राग गौडमल्हार यांचं सुंदर स्वरचित्र साकारलं. शिष्यांची अचूक पारख असणाऱ्या गुरूजींनी त्यांना एकाच तराण्यातून त्याचं मर्म शिकवलं होतं. पुढे त्या एकातून अनेक गात राहिल्या. नाटय़ अभिनेते व मुंबई आकाशवाणीवर गायन करणारे जेष्ठ शिष्य पं. वासुदेव जोशी यांनी गुरूजींनी रचलेल्या मयूरबिहागाचे दमदार गायन सादर केले. हजाराव्या कार्यक्रमाकडे वाटचाल करणाऱ्या गझल गायक अनिरुद्ध जोशी यांना गुरूजींनी त्यांच्या इच्छेनुसार सुगमसंगीतासाठी उचित मार्गदर्शन केले होते. कॉलेजमध्ये स्पर्धेत गाण्यासाठी गुरूजींनी एका रात्रीत बांधून दिलेला बिहागमधील ७ मिनिटांचा चतरंग जोशींनी गायला. ‘याचं नोटेशन मला मिळेल का?’ असं प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी त्यावेळी जोशींना विचारलं होतं.
‘परसगंधा’ हे गुरूजींनी ‘सदानंद’ नावाने लिहिलेले बंदिशीचे हस्तलिखित. डॉ. विजया टिळक यांनी गुरूजींच्या बंदिशीतले सौंदर्य प्रात्यक्षिकासह उलगडून दाखवले. पकड घेणारे मुखडे, रागामध्ये नवीन रसाचा परिपोष, ताल वैविध्य, विषय वैविध्य, नादमयता, लयकारी, भावनेचं शब्दात आणि शब्दाचं सुरात भाषांतर करण्याची किमया, ठुमरी, टपाल, तराणा, चतरंग, भजन असे वैविध्य, महत्त्वपूर्ण विराम; अशा वैशिष्टय़ांनी नटलेल्या बंदिशी म्हणजे गुरूजींची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा मनोहारी आविष्कार. या सौंदर्यावर श्रोते लुब्ध झाले.
गुरूजींच्या शिष्या अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. सरोज आपटे व कीर्ती आगाशे यांनी सूत्रसंचालन केले. गुरूजींविषयीच्या कृतज्ञतेबरोबरच काळे आजींनी जपलेल्या स्नेहबंधानाही उजाळा मिळाला. एकंदरीत या स्वरोत्सवाने भूतकाळ सजीव केला, असं म्हणायला हरकत नाही.