ठाणे- शहरात होत असलेल्या बेकायदा पार्किंगला सर्वसामान्यांसह आता, शहरातील कलाकार देखील हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी देखील कॅडबरी जंक्शनजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात त्यांच्या समाजमाध्यमावर संताप व्यक्त केला होता. त्यापाठोपाठ,वसंतविहार याठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन बेशिस्त पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाचा अभिनेता शशांक केतकर यांनी व्हिडीओ काढून त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित केला आहे. या दुहेरी पार्किंग समस्येवर उपाय तेव्हाच होतो जेव्हा कोणाचा जीव जातो असे म्हणत शशांक केतकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिक रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. अशा वाहन पार्किंगमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाकडून अधिकृतरित्या रस्त्याच्या एका मार्गिकेवर वाहने उभे करण्यासाठी परवानगी आहे. ठराविक ठिकाणीच अशा पद्धतीने वाहने उभी करु शकतो. परंतू, शहरातील काही ठिकाणी बेकायदेशीररित्या दोन मार्गिकेपर्यंत ही वाहने उभी केली जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वाहनांमुळे याठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते तर, अनेकदा अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. विशेष करुन पादचाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत असतो. सर्वसामान्यांसह आता शहरातील कलाकार मंडळींना देखील या दुहेरी पार्किंगचा त्रास होऊ लागला आहे. अभिनेता शशांक केतकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर वसंत विहार येथे होत असलेल्या दुहेरी पार्किंग संदर्भात संताप व्यक्त केला आहे. अशा दुहेरी पार्किंग समस्येवर उपाय तेव्हाच होते जेव्हा कोणाचा तरी जीव जातो अशी संतापजन प्रतिक्रिया शशांकने या व्हिडीओद्वारे व्यक्त केली आहे.