भाईंदर : देशभरात सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सहभाग नोंदवला. यासाठी मीरा रोड येथे मीरा भाईंदर महापालिकेकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. या अंतर्गत ९ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. शिवाय याचा लाभ घेतलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचा अनुभव जाणून घेतला.

हेही वाचा : उल्हासनगर: महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वार्ड

महाराष्ट्र राज्यातून यात केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. यासाठी मीरा रोड येथील बुद्ध विहार व विपश्यना केंद्रात असलेल्या सभागृहात मोठा एलईडी टीव्ही लावून महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गोयल यांच्यासह महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील, आमदार गीता जैन, आयुक्त संजय काटकर, भाजप जिल्हा अध्यक्ष किशोर शर्मा, माजी महापौर ज्योस्त्ना हसनाळे, विधानसभा प्रमुख रवि व्यास, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता पाटील आणि इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘विकासभारत दुत’ बनण्याचे नागरिकांना आवाहन

देशात नरेंद्र मोदी सरकार मार्फत विविध योजना राबावल्या जात आहेत. याचा मोठा लाभ हा मध्यम वर्ग व गरीब नागरिकांना व्हावा हा हेतू आहे. यासाठीच ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन करण्यात आले. त्यामुळे समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी आपल्या समाजातील गरजू लोकांपर्यत केंद्र शासनाचे उपक्रम पोहोचवावे म्हणून स्वतः ‘विकास भारतदुत’ म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कार्यक्रमाला उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांना केले.