जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूककोंडी टाळून विनाअडथळा पोहोचता यावे, यासाठी २६ किलोमीटरचा उन्नत आणि दुमजली मार्ग बांधण्याचा सिडकोचा प्रस्ताव असून, त्या दृष्टीने अभ्यासही सुरू करण्यात आला आहे.     

मुंबईपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वेगवेगळे रस्ते तसेच मेट्रो मार्गिकांची आखणी पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे यासाठी सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत. ठाण्यातून नियोजित विमानतळापर्यंत जाण्यासाठी अतिशय कोंडीचा असलेला ठाणे-बेलापूर मार्ग हाच सध्याचा पर्याय आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन टोल नाके किंवा कळव्यातील कोंडीतून प्रवास करतच ठाणेकरांना नव्या विमानतळाकडे जावे लागेल, हे लक्षात घेऊन दिघा येथील पटनी चौक ते वाशी (१७ किमी) आणि वाशी ते थेट नवे विमानतळ (९ किमी) असा उन्नत आणि दुमजली (डबल डेकर) मार्ग उभारणीचा प्रकल्प सिडकोने आखला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : डायघर कचरा प्रकल्पला ग्रामस्थांचा विरोध – प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पुढे सरकत असताना सिडकोने विमानतळ- बेलापूर ते मानखुर्दपर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास हाती घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोची स्वतंत्र मार्गिका यापूर्वीच प्रस्तावित असली तरी त्यास मेट्रो मार्गिकांची जोड देण्याचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सिडको संयुक्तपणे राबविणार आहे. तसेच शिवडी-न्हावाशेवा बहुचर्चित सागरी सेतूपासून उलवे उपनगराला फेरा घालून थेट विमानतळापर्यंत पोहोचणारा सात किलोमीटरच्या आणखी एका उन्नत मार्गाचे काम सिडकोने हाती घेतले आहे. मुंबईपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी या वेगवेगळय़ा प्रकल्पांची कामे हाती घेतली जात असताना ठाणे तसेच त्यापलीकडच्या उपनगरांमधून नव्या विमानतळापर्यंतचा प्रवास सोयीचा आणि कोंडीविरहित कसा होईल याचा इतकी वर्षे साधा अभ्यासही झाला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी आदेश दिल्यानंतर वेगाने हालचाली सुरू झाल्या असून ठाण्यापासून विमानतळापर्यंत नव्या मार्गिकेची आखणी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

येत्या सहा महिन्यांत कामाला सुरुवात?

सद्य:स्थितीत ठाण्यावरून नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करण्यासाठी ठाणे-बेलापूर हाच सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे. या मार्गावर येण्यासाठी ठाणेकरांना मुलुंड तसेच ऐरोली हे दोन टोल नाके ओलांडावे लागणार आहेत. याशिवाय कळव्यातून या मार्गाच्या दिशेने ये-जा करण्याचा काहीसा गर्दीचा पर्यायही आहे. या दोन्ही मार्गिका कोंडीच्या असल्याने ठाण्यासाठी विमानतळापर्यंत स्वतंत्र असा रस्ता किंवा उन्नत मार्ग असावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले होते. त्यानुसार सिडकोने यासाठी स्वतंत्र अभ्यासगट नेमला आहे. त्यामुळे या मार्गिकेचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्याच्या उद्देशाने वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसा असेल नवा रस्ता?

सिडकोच्या प्राथमिक आराखडय़ानुसार, दिघा येथील पटनी मैदानाजवळील धन निरंकारी चौकापासून वाशीच्या पाम बीच मार्गापर्यंत १७ किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येईल. तो ठाणे-बेलापूर मार्गास समांतर असेल. पाम बीच मार्गापासून थेट विमानतळापर्यंत नऊ किलोमीटरचा दुमजली मार्ग उभारला जाईल. या प्रकल्पासंदर्भात अभ्यास करण्याचे काम सिडकोने अर्बन मास ट्रान्सिस्ट कंपनीला  देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिडकोतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.  ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट उन्नत मार्गिका असावी अशी सूचना मी यापूर्वीच दिली होती. ठाणे आणि आसपासच्या शहरांपासून विमानतळापर्यंत ये-जा करणारा मोठा प्रवासी वर्ग असेल. त्याच्यासाठी हा नवा मार्ग सोयीचा आणि महत्त्वाचा ठरू शकेल. – एकनाथ शिंदे, मु्ख्यमंत्री