महापालिका क्षेत्रातील नागरी कामांना गती देवून नागरीकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडली नाही किंवा कोणत्याही नागरिकांने त्यांच्या कामाबाबत तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचनाही या बैठकीदरम्यान देण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात अतिरिक्त आयुक्त -१ संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त – २ संजय हेरवाडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मनीष जोशी आणि सर्व प्रभाग समित्यांचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात नागरी सुविधेअंतर्गत सुरू असलेली कामे युद्धपातळीवर पुर्ण करणे, शहराचे सुशोभिकरण, संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी योग्य नियोजन करणे तसेच नागरिकांचे म्हणणे नम्रतेने ऐकून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त माळवी आणि हेरवाडे या दोघांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा : ठाणे शहरात सौंदर्यीकरणाची कामे उत्तम दर्जाची करण्यावर लक्ष केंद्रित करा ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागरिकांना मुलभूत सेवा पुरविणे हे कर्तव्य असून अधिकाधिक नागरिकांचा महापालिकेशी सातत्याने संबंध येत असतो. नागरिकांनी सामाजिक कामासाठी संबंधित प्रभागसमितीकडे संपर्क साधल्यास किंवा निवेदन दिल्यास त्याचा स्थानिक पातळीवर निपटारा होणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना मुख्यालयांशी संपर्क साधण्याची वेळ येवू नये या दृष्टीने प्रभाग समितीस्तरावर सर्व संबंधितांनी योग्य नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. तसेच नागरी विकासांतंर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्प कामे सुरू असून या कामांचा आढावा घेवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच घनकचरा हा महत्वाचा विषय असून संपूर्ण महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानातंर्गत सुरू असलेले काम अधिक गतीमानतेने करून कचरामुक्त शहरासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता करावी. संपूर्ण परिसर सुशोभित राहील या दृष्टीनेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांचा रील बनवणाऱ्या निलंबित महिला कंडक्टरला पाठिंबा, म्हणाले, “उच्चभ्रू…”

सर्व अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पडली नाही किंवा कोणत्याही नागरिकांने त्यांच्या कामाबाबत तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी यावेळी दिला. प्रत्येक अधिकारी वर्गाने त्यांच्याकडे असलेला कामांबाबतचा अहवाल तयार करावा आणि आगामी काळातील उपक्रमांबाबतही नियोजन करावे. तसेच सर्व प्रभागसमिती व प्रभागसमिती अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी – कर्मचारी वर्गाने आपापसात सामंजस्याने सर्व कामे पुर्ण होतील या दृष्टीने काम करावयाचे आहे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.