ठाणे : मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यु झाला असून या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून पाच प्रवाशांचा मृत्यु झाला. ही लोकल मुंबईच्या दिशेने जात असताना, दुसऱ्या बाजूनेही एक कसारा दिशेने लोकल जात होती. त्यावेळी एका तीव्र वळणाजवळ मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलमधून हे प्रवासी खाली पडून हा अपघात झाला, असे बोलले जात आहे. असे असले तरी हा अपघात नेमका कसा झाला, याविषयी वेगवेगळे अंदाजे वर्तविले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत.
मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अपघातानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशाचप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताबाबत समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.