कल्याण – मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकांजवळील शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांचा रेल्वे प्रशासनाने मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. रेल्वेच्या अमृत योजनेतून ही कामे केली जात आहेत. या कामांसाठी एकूण ३३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
याशिवाय टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी पूल उभारणीचे काम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अमृत योजनेतून टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला सरकता जिना, उद्वाहन, सोयीच्या ठिकाणी तिकीट खिडक्या, वाहनतळ अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. या कामासाठी रेल्वेने २५ कोटींची तरतूद केली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद करून या फाटकावर रेल्वेने उड्डाण पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी ५० कोटी ५३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीत राज्य सरकार, रेल्वेचा निम्म वाटा आहे. आतापर्यंत या पुलाच्या कामासाठी १४ कोटी ५७ लाख रुपये खर्च झाले आहेत. या पुलाचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करून हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
शहाड रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसाठी अमृत योजनेतून आठ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण, डोंबिवलीनंतर टिटवाळा परिसरात झपाट्याने विकास होत आहे. नागरीकरण या भागात वाढत आहे. मुंबईतील बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक टिटवाळा परिसरात निवासासाठी आले आहेत. टिटवाळा येथे गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो भाविक दररोज टिटवाळा येथे येतात. टिटवाळा रेलवे स्थानकातील गर्दी विचारात घेऊन रेल्वेने या रेल्वे स्थानकात अधिकाधिक प्रवासी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुरबाड, नगरकडून येणारे बहुतांशी वाहन चालक मुंबई-नाशिक महामार्गावर जाण्यासाठी मधला मार्ग म्हणून टिटवाळा शहराचा विचार करतात. ही वाहने भिवंडी वळण रस्ता किंवा पडघा येथे मधल्या मार्गाने जातात. टिटवाळा शहरात ही वाहने आली की टिटवाळ्यात कोंडी होते. त्यामुळे रेल्वे फाटकावर पूर्व, पश्चिम भाग जोडणारा उड्डाण पूल झाला की बाहेरून येणारी वाहने परस्पर टिटवाळा शहरात न येता इच्छित स्थळी निघून जाणार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.