किशोर कोकणे/ पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांच्या स्वागतासाठी अनेकांनी तयारी केली आहे. यंदा हे दिवस साजरे करण्यासाठी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील रिसॉर्ट, शेतघरे (फार्महाऊस) आणि बंगल्यांना अधिक पसंती असल्याचे दिसते.

नववर्ष पूर्वसंध्येला आणि नाताळनिमित्ताने मुंबई, उपनगरातून हजारो पर्यटक ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह पालघर आणि रायगड पर्यटनासाठी जातात. ठाणे जिल्ह्यातील येऊर, बदलापूर बारवी, मूळगाव ही ठिकाणे यासाठी प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा >>> घोडबंदर येथे व्यावसायिकाची हत्या; आर्थिक व्यवहारातून वाद; मुख्य सूत्रधार ताब्यात

रायगड येथील कर्जत, खोपोली आणि पालघर येथील केळवे, सफाळे, बोर्डी भागात मोठया प्रमाणात नागरिक जातात. यंदा   ३१ डिसेंबरला रविवार आहे. त्यामुळे अनेकांनी हे दिवस साजरे करण्यासाठी शेतघरे, रिसॉर्ट आणि हॉटेल नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत ४० ते ५० टक्के घरे नोंदणी झाल्याने हॉटेल मालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. पालघर जिल्ह्यातील तिघरे गावात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये ३१ डिसेंबरचा दिवस साजरा करण्यासाठी मुंबईतील एका गृहसंकुलाने नोंदणी केली आहे. याठिकाणी २४ तासांसाठी एका व्यक्तीमागे तीन हजार रुपये आकारण्यात आले आहेत, अशी माहिती रिसॉर्टचे प्रमुख श्रेयस पाटील यांनी दिली.  पालघर, वसईमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक हे मुंबई शहरातील असतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे : गायमुख खाडीत मृतदेह आढळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरांत वाढीची शक्यता.. नेरळ येथील एका शेतघरावर २४ तासांचे प्रत्येक व्यक्तीमागे १८०० रुपये आकारण्यात येतात. यामध्ये दोन वेळची न्याहरी, दोन वेळचे जेवण आणि इतर सुविधा देण्यात येतात. परंतु, ३१ डिसेंबरच्या दरम्यान याठिकाणी एका व्यक्तीमागे २२०० रुपये आकारण्यात येणार आहेत. यामध्ये न्याहरी आणि जेवणाचा समावेश आहे, असे येथील शेतघर व्यवस्थापक उमेश कवाडकर यांनी सांगितले.