डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील पिसवली गाव हद्दीत शिळफाटा रस्त्यावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून उत्तरप्रदेशचा मूळ निवासी असलेल्या २१ वर्षाच्या गांजा तस्कराला मंगळवारी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४० हजार रूपये किमतीचा तीन किलो गांजा जप्त केला आहे.

शिवलोचना हंसराज सिंह (२१) असे या तस्कराचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागातील वर्षा इमारतीजवळील डी. टी. चाळीत राहतो. तो मूळचा उत्तरप्रदेशातील मिर्झापूर तालुक्यातील डॅगहर गावातील रहिवासी आहे. शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गाव हद्दीत एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाला समजली होती.

पथकाने मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान पिसवली भागात सापळा लावला होता. साध्या वेशातील पोलीस पिसवली परिसरात सदर इसम येणाऱ्या जागेत टेहळणी ठेऊन होते. ठरल्या वेळेत एक तरूण पिसवली भागातील एका मैदान भागात आला. तो बराच उशीर त्या भागात फिरत होता. हाच तो तरूण असल्याचा संशय गस्त घालणाऱ्या पोलिसांना आला.एका पोलिसाने या तरूणाच्या दिशेन जाऊन याठिकाणी काय करतो आणि कुठे जायायचे अशी विचारणा केली. त्यावेळी तो तरूण गांगरला.

प्रश्नांची उत्तरे तो पोलिसांना योग्यरितीने देऊ शकला नाही. त्याने पिसवली मैदानातून पळण्याची तयारी केली. त्याचवेळी आजुबाजुला तैनात असलेल्या गस्तीवरील पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी दिली नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याची चौकशी केली. त्याचे नाव शिवलोचना सिंह असल्याचे स्पष्ट झाले. त्याची अंगझ़ड़ती पोलिसांनी घेतली. त्याच्याजवळ तीन किलो वजनाचा ४० हजार रूपये किमतीचा गांजा आढळून आला. हा गांजा त्याने कोठुन आणला. तो हा गांजा कोणाला विकणार होता. याची समाधानकारक उत्तरे शिवलोचना देऊ शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा सराईत तस्कर असण्याची शक्यता विचारात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हा दाखल केले. त्याला अटक केली.या कारवाईत पोलीस निरीक्षक जयपालसिंह राजपुत, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, साहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार सदाशिव देवरे, अमित शिंदे, राहुल शिंदे, खुशाल नेरकर यांच्या पथकाने केली. मागील आठ महिन्यांपासून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून पोलिसांनी गांजा तस्करांची धरपकड सुरू केली आहे. शहरातील गांजा तस्करांचे बहुतांशी अड्डे पोलिसांनी उध्दवस्त केले आहेत. अनेक वर्षानंतर कल्याण डोंबिवलीत पोलिसांकडून आक्रमकपणे नशामुक्त अभियान चालविले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.