कांदा आणि अन्य भाज्यांच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकगृहाचे आर्थिक गणित बिघडवले असताना, फोडणीतील महत्त्वाचा घटक असलेला लसूणही आता महाग झाला आहे. घाऊक बाजारात होणारी आवक घटल्यामुळे लसणाचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात तर लसणाचे दर किलोमागे ६० रुपयांनी वाढून २४० ते २८० रुपयांवर पोहोचले आहेत.
सद्य:स्थितीला घाऊक बाजारात लसणाची विक्री १०० रुपये प्रति किलो या दराने होत आहे. एरवीपेक्षा हे दर चढे आहेत. घाऊक दर वाढल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा लसूण २४० ते २८० रुपये किलो इतक्या चढय़ा दराने विकला जात आहे.
यंदाच्या वर्षी नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ात वारंवार निर्माण झालेली पूरपरिस्थितीमुळे भाजीपाल्यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यंतरी भाजीपाल्याची आवक वाढली होती. मात्र परतीच्या पावसाने कृषीमालाचे गणित पुन्हा बिघडवले. या पूरस्थितीचा फटका लसून उत्पादनालाही बसला आहे. वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक मुख्यत्वे करून नाशिक, पुणे, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून होत असते. सध्या या भागातून येणाऱ्या लसणाची आवक घटल्याची माहिती समोर आली आहे.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज लसणाच्या १० गाडय़ा येत होत्या. सध्या ६ ते ७ गाडय़ा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहेत. आवक कमी असल्याचे कारण सांगून किरकोळ बाजारीतल विक्रेते अक्षरश: ग्राहकांची लूट करताना पाहायला मिळत आहेत.
लसणाचे घाऊक दर
दिनांक दर (रु./ कि.)
१८ ऑक्टोबर १०५
१९ ऑक्टोबर १००
२२ऑक्टोबर ११०
२३ ऑक्टोबर १००
२४ ऑक्टोबर १००
२५ ऑक्टोबर १०५
३० ऑक्टोबर १००
लसणाला बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. सध्या बाजारात लसणाची आवक ही कमी प्रमाणात होत आहे. आवक कमी असल्यामुळे लसणाच्या किमतीत वाढ झाली आहे.
– किशोर भानुशाली, लसूण विक्रेते.