ठाणे – ठाणे शहरातील बाळकुम परिसरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी असलेली सिग्नल यंत्रणा गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक बंद पडली. यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अचानक झालेल्या या बिघाडामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना ५ मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागला. यामुळे नागरिक हैराण झाले.
बाळकुम हे ठाणे शहरातील वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हा परिसर भिवंडी, माजिवडा, कापूरबावडी आणि ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांना जोडतो. शिवाय, शहरातील विविध रस्ते येथे एकत्र येतात. तसेच वर्षभरापूर्वी या परिसरात इस्कॉन मंदिर आणि नमो द ग्रॅड सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा विविध जिल्ह्यातून आणि शहरातील नागरिक पर्यटनासाठी येत असतात. त्याचबरोबर कशेळी, काल्हेर, भिवंडी या भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. यामुळे विविध शहरातील महिला आणि पुरूष कामानिमित्ताने बाळकुम मार्गे प्रवास करत असतात.
मात्र, गुरुवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान यशस्वी नगर आणि बाळकुम येथील सिग्नल यंत्रणा अचानक बंद पडली. यामुळे या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना ५ मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागला. या वाहतूक कोंडीमध्ये बस गाड्या, रिक्षा अडकल्या होत्या. यामुळे नागरिक हैरण झाले होते. या वाहतूक कोंडी मध्ये यशस्वी नगर, बाळकुम, दादलानी पार्क, साकेत, कशेळी, काल्हेर , भिवंडी या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या मार्गिकेवर वाहतूक ठप्प झाली होती. विशेषत: कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना या कोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडी मध्ये काही टीएमटी च्या बस गाड्या देखील अडकल्यामुळे ठाणे स्थानक परिसरात असलेल्या सॅटिस पुलावर दादलानी पार्क, दोस्ती या ठिकाणच्या बस गाड्या उशिरा पोहचत आहेत.