कल्याण : काटई-बदलापूर रस्त्यावरील नेवाळी ते अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीसी भागात मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सध्या अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रात सुरू आहे. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता असल्याने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर तुफान वाहन कोंडी होत आहे.

गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. या वाहन कोंडीने प्रवासी, वाहन चालक हैराण आहेत. कर्जत, मुरबाड, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ भागातून येणारे प्रवासी ठाणे, मुंबई, नवी मुंबईत जाण्यासाठी या रस्त्याचा प्राधान्याने वापर करतात. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतून उलट मार्गाने जाणारे प्रवासी याच रस्त्याला प्राधान्य देतात. सर्वाधिक वाहन वर्दळीचा रस्ता सतत वाहन कोंडीत अडकत असल्याने प्रवासी संतप्त आहेत.

हेही वाचा…कल्याणमधील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांना मानपाडा पोलिसांची नोटीस

अनेक नोकरदार सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी या रस्त्याने निघतात. ते या कोंडीत अडकून पडत असल्याने त्यांना कामावर जाण्यासाठी दररोज उशीर होतो. यामध्ये एसटी. परिवहन सेवेच्या बसचा समावेश असतो. कोंडी झाली की दुचाकी स्वार सुसाट वेगाने वाहने पुढे नेऊन रस्त्याची दुसरी मार्गिका बंद करून टाकतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. या भागात वाहतूक पोलीस, सेवक तैनात असतात. पण दुप्पट वाहन भारामुळे कोंडी सोडविताना त्यांची दमछाक होते. कामावरून घरी परतताना प्रवाशांचे या कोंडीत हाल होत आहेत.

अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीसी भागात मालवाहू अवजड वाहनांची वर्दळ असते. या वाहनांची भर या गर्दीत पडते. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांमधील वाहन कोंडीतून जाण्यापेक्षा प्रवासी या शहरांबाहेर जामाऱ्या काटई ते कर्जत या रस्त्याला प्राधान्य देतात. या रस्त्यावर अतिरिक्त एमआयडीसी अंबरनाथ भागात सतत कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. या रस्त्यांची कामे दिवसरात्र सुरू ठेऊन पूर्ण करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

हेही वाचा…डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा प्रवाशांना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, नेवाळी नाका भागात स्थानिकांनी नेवाळी चौकामध्ये रस्ते अडवून दुकाने, व्यापारी गाळे बांधले आहेत. या दुकानांमुळे या भागातून अवजड, मोठ्या वाहनांना वळण घेणे मुश्किल होते. त्यामुळे नेवाळी नाका चौकातील सर्व बेकायदा दुकाने एमआयडीसी, राज्य रस्ते विकास महामंडळ या नियंत्रक संस्थेने तोडून टाकण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.