कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला ते वाडेघर बाह्य वळण रस्त्यावर सकाळ, सायंकाळ अनेक हुल्लडबाज तरूण वेगाने दुचाकी चालवून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. या दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्यावर नियमित अपघात होतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी वाडेघर मधील संतप्त ग्रामस्थांनी दुर्गाडी ते वाडेघर वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

टिटवाळा ते दुर्गाडी या १२ किलोमीटरच्या बाह्य वळण रस्ते मार्गातील दुर्गाडी ते वाडेघर गावच्या दरम्यानचा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुस्थितीत केला आहे. या रस्त्याला पुढे पोहच रस्ता नसल्याने हा या रस्त्यावरून इतर वाहनांची वाहतूक होत नाही. हा प्रशस्त सुस्थितीत रस्ता मोकळा असल्याने अनेक दुचाकीस्वार सकाळ, सायंकाळ दुर्गाडी ते वाडेघर वळण रस्त्यावर दुचाकी घेऊन येतात. भरधाव दुचाकी चालविण्याच्या स्पर्धा लावतात. या रस्त्यावर कल्याण शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित फेरफटका मारण्यासाठी येतात. हे नागरिक दुचाकींचा कानठळ्या बसविणारा आवाज, त्यांची हुल्लडबाजी, दुचाकी चालविताना असणारा निष्काळजीपणा यामुळे हैराण आहेत. अनेक अपघात या रस्त्यावर नियमित होतात, असे वाडेघरच्या ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा : ज्येष्ठ नागरिकाला पत्नीने मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने जाळले

रात्रीच्या वेळेत अनेक तरूण, तरुणी या रस्त्यावर फिरण्यासाठी येतात. रात्रीच्या वेळेत मद्यपी या रस्त्यावर बसून मद्यपान करतात. मद्याच्या बाटल्या रस्त्यावर फोडण्यात येतात. त्याचा पादचाऱ्यांना त्रास होतो. या रस्त्याच्या दुभाजकामध्ये मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. हा रस्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारीत असला तरी त्याचे नियंत्रण एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे पालिका अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा : विशेष नागरी वसाहती करसवलतीविनाच! विकासकाकडे शुल्क भरूनही ग्राहकांवर मालमत्ता कराचा भार

वाडेघर भागात अनेक नवीन गृहसंकुले आहेत. रात्रीच्या वेळेत हुल्लडबाज तरूण वाडेघर वळण रस्त्यावर दुचाकींचा कानठळ्या बसविणारा आवाज करत दुचाकी चालवितात. त्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. या तरूणांच्या त्रासाला कंटाळून वाडेघर मधील ग्रामस्थांनी येथील वळण रस्ता बांबुचे अडथळे उभे करून बंद केला आहे. जोपर्यंत वळण रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत हे अडथळे काढले जाणार नाहीत. अन्यथा अनेक अपघात या रस्त्यावर होतील, असे वाडेघरच्या ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याण विकास केंद्र रखडले? – आराखडा तयार, योजना पूर्ण करण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दुर्गाडी-वाडेघर रस्त्यावर आम्ही सकाळ, सायंकाळ फिरण्यासाठी येतो. सुस्थितीत असलेल्या या रस्त्यावर हुल्लडबाज तरूण वेगाने दुचाकी चालवितात. रात्रीच्या वेळेत मद्यपी याठिकाणी बसलेले असतात. मद्याच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या जातात. त्यामुळे ग्रामस्थांंनी रस्त्याची हानी होण्यापूर्वीच रस्ता बंद केला. हे योग्य केले आहे.” – केशव पाटील, कल्याण.