कल्याण – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी गुरूत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात १८ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या महत्वाच्या कामासाठी या गुरूत्व जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणारी गावे, परिसरातील गावांना होणारा पाणी पुरवठा पुढील आठवड्यात गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या कालावधीत बंद राहणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापत्य अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे. बारवी धरणातून येणारे पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळ एमआयडीसीकडून उचलले जाते. हे कच्चे पाणी जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवहिन्यांद्वारे बदलापूर, अंबरनाथ निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा, मुंब्रा परिसराला पाणी पुरवठ्यासाठी दैनंदिन वितरित केले जाते.

बारवी जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशयातील बारवी गुरूत्ववाहिनीच्या एक ते तीन वाहिनींचे उन्नत्तीकरण आणि तातडीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी एमआयडीसीने प्रस्तावित केले होते. परंतु या कालावधीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने एमआयडीसीला या कालावधीत गुरुवत्व वाहिनी दुरुस्तीचे काम करता आले नव्हते. त्यामुळे या कालावधीत घेण्यात आलेला पाणी पुरवठ्यासाठीचा बंद एमआयडीसीने रद्द केला होता.

आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या महिन्यात प्रस्तावित केलेले बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्ती आणि उन्नत्तीकरणाचे काम एमआयडीसीने १८ सप्टेंबर, गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर रात्री १२ या कालावधीत करण्याचे नियोजन केले आहे. या चोवीस तासाच्या कालावधीत जलवाहिन्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा होणाऱ्या बदलापूर नगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर पालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणारी गावे, अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागातील गावांना होणारा पाणी पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका, गृहसंकुले आणि नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा करून ठेवण्याचे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

बंद असेल त्या काळात उद्योजक एक दिवस पुरेल इतका पाणी साठा आपल्या कंपनी आवारात खासगी टँकरच्या माध्यमातून साठा करून ठेवतात. त्यामुळे उद्योजक या बंदच्या काळात आपल्या कंपनीतील उत्पादन सुरू ठेवतात.