ठाणे : कल्याण-शिळफाटा मार्गावर अवजड वाहनाचा अपघात झाल्याने बुधवारी सकाळी शिळफाटा आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर शिळफाटा ते मुंब्रा देवी मंदिर आणि शिळफाटा मार्गावर पलावा सिटी परिसरपर्यंत कोंडी झाली होती. त्यामुळे नवी मुंबई, डोंबिवलीहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालाकांना २५ ते ३० मिनीटे लागत होते. सुमारे पाच तासानंतर म्हणजेच, दुपारी १ नंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.

भिवंडी, गुजरात येथून हजारो अवजड वाहने उरण येथील जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करत असतात. बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कल्याण फाटा परिसरात कंटेनर आणि एका दुचाकीचा किरकोळ अपघात झाला. त्यामुळे कंटेनर भर रस्त्यालगत एका भिंतीला धडकून बंद पडले. या घटनेनंतर तो वाहन चालक तेथून फरार झाला. वाहनामध्ये मोठ्याप्रमाणात साहित्य असल्याने वाहतुक पोलिसांना हे अवजड वाहन हटविताना नाकी नऊ आले.

मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा, कल्याणफाटा भागातून हजारो हलकी, अवजड वाहने वाहतुक करत असतात. कल्याण, डोंबिवली, ठाणे शहरातून हजारो नागरिक याच मार्गाने नवी मुंबईत जातात. अपघातामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कल्याणफाटा, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा, महापे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली. अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना सुमारे अर्धा तास लागला. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतुक कोंडीत आणखी भर पडली. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर शिळफाटा ते मुंब्रा देवी मंदिर परिसर पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. तर, शिळफाटा मार्गावर शिळफाटा ते पलावा सिटी पर्यंत वाहतुक कोंडी झाली. वाहतुक पोलिसांकडून येथील वाहतुक कोंडी सोडविताना नाकी नऊ आले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास येथील वाहतुक सुरळीत झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्याला कोंडीचे ग्रहण

गेल्याकाही दिवासंपासून विविध प्रकल्पांची कामे, वाहतुक बदल, रस्ते दुरुस्ती या कामांमुळे वाहतुक बदल केले जात आहे. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर बसत असून कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठाणे शहराला कोंडीचे ग्रहण लागल्याची चर्चा ठाणेकर करत आहेत.