कल्याण : कल्याण शहराच्या पश्चिमेत मंगळवारी सकाळी कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा बंद राहण्याची कोणतीही पूर्वसूचना पालिकेने कल्याण पश्चिमेतील नागरिकांना दिली नव्हती. त्यामुळे सकाळच्या वेळेत पालिकेच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.
कल्याण पश्चिमेत पालिकेकडून दररोज सकाळी सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान विविध प्रभागानुसार पाणी येते. नेहमीप्रमाणे पाणी येईल या आशेवर असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांचा मंगळवारी हिरमोड झाला. मोहिली, बारावे येथील उदंचन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जलशुध्दीकरण केंद्र, उदंचन केंद्रांचा वीज पुरवठा सुरळीत आहे. तरीही पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
मंगळवारी सकाळी घराघरात पाणी न आल्याने नागरिकांनी पालिका कार्यालयात, अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. पाणी येणार नव्हते तर अगोदर पूर्वसूचना का दिली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून पालिका अधिकाऱ्यांना विचारण्यात येत होता.
कल्याण पश्चिमेत पाणी पुरवठा न होण्याबाबत मिळालेली माहिती अशी, की कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील पुष्कराज हाॅटेल समोरील महम्मद अली चौकात सीमेंट काँक्रीट रस्त्याखालून एक पालिकेची मुख्य जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीवर भार येऊन ही जलवाहिनी दोन दिवसापूर्वी रस्त्याखाली फुटली. जमिनीखालून पाणी वाहून जाऊ लागले. महम्मद अली चौक भागात काँक्रीट रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्याची माहिती पालिका पाणी पुरवठा अभियंत्यांना सोमवारी समजली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महम्मद अली चौकात खोदकाम करून जलवाहिनीला लागलेली गळती शोधली. त्यावेळी वाहिनीचे नुकसान झाल्याचे समजले.
फुटलेली जलवाहिनी बदलण्यासाठी पालिकेच्या साठ्यात त्या मापाची वाहिका नव्हती. ही वाहिका शोधण्यात अधिकाऱ्यांचा वेळ गेला. या जलवाहिनीवरून कल्याण पश्चिमेच्या अनेक भागांना पाणीपुरवठा केला जातो. मोहिली, बारावे येथून ही जलवाहिका आली आहे. जलवाहिका दुरुस्तीचे काम पाणी पुरवठा विभागाचे अभियंते आणि संबंधित ठेकेदाराने हाती घेतले आहे. कल्याण, डोंंबिवली शहरात अनेक ठिकाणी सीमेंट रस्ते कामे करताना पाणी पुरवठ्याच्या, मलनिस्सारणाच्या वाहिका रस्त्याखाली ठेऊन कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा वाहिका आता काँक्रीटचा भार वाढून फुटण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगण्यात येते.
कल्याण पश्चिमेत महम्मद अली चौक भागात सीमेंट रस्त्याखाली जलवाहिनी फुटली आहे. ती दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुुळे कल्याण पश्चिमेत पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. ही वाहिका लवकरच दुरुस्त करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – अशोक घोडे, कार्यकारी अभियंता,पाणी पुरवठा विभाग.