MNS Protest at Thane Railway Station : “रेल्वे स्थानकांवरील स्टॉल हटवा, अन्यथा आम्ही सगळे स्टॉल उद्ध्वस्त करू” असा इशारा मनसेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. सोमवारी मुंब्रा येथे भीषण रेल्वे दुर्घटना होऊन त्यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक असा धडक मोर्चा काढला. यावेळी मनसेने रेल्वे प्रशासनाला रेल्वे स्थानकांवरील वर्तमानपत्र व खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याची मागणी केली आहे. तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी उचित उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
मनसे नेते अविनाश जाथव म्हणाले, “रेल्वे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात मात्र, रेल्वे प्रशासन त्यांना चांगल्या सुविधा देत नाही. रेल्वे स्थानकांवर शौचालये नसतात, असली तरी ती स्वच्छ नसतात. दररोज रेल्वे दुर्घटनेच्या बातम्या वाचायला, पाहायला मिळतात. अशा स्थितीत लोकांनी रेल्वेने प्रवास कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. आमचे लोक घरून बाहेर पडतात. रेल्वे प्रवास करण्यापूर्वी परतीचं तिकीटही काढतात. कारण त्यांना दिवसभर त्यांची कामे आटपून घरी परतायचं असतं. मात्र, आता सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी परतेल की नाही याची शास्वती नाही. अशाने लोक परतीचं तिकीट काढणं बंद करतील. कारण त्यांना घरी परतण्याची खात्रीच नसेल. रेल्वे प्रशासन बदललं नाही तर अशीच स्थिती कायम राहीली”.
फलाटांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल हवेत कशाला : अविनाश जाधव
अविनाश जाधव म्हणाले, “रेल्वे प्रशासन बदललं नाही तर आम्हालही माहिती आहे आता कसं पुढे जायचं. ठाण्यासह कोणत्याही रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर खाद्यपदार्थ व वर्तमानपत्रांचे स्टॉल कशाला हवेत? त्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. ही गोष्ट आमच्या लक्षात येते, मात्र रेल्वे प्रशासनाला का कळत नाही? लोक रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर पाच मिनिटात ट्रेन पकडतात. मात्र, फलाटांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि टपऱ्या हव्यात कशाला? त्याऐवजी प्रवाशांसाठी, वृद्ध व दिव्यांगांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करा.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणाले, “रेल्वे प्रशासनाने पुढील आठ दिवसांमध्ये फलाटांवरील स्टॉल हटवले नाहीत तर आम्ही ते उद्ध्वस्त करू. काही लोकांना पोसण्यासाठी रेल्वे प्रशासन निविदा काढतं. मात्र, ते स्टॉल आता जीवघेणे ठरत आहेत. सगळे स्टॉल तिथून काढून टाका नाहीतर आम्ही ते हटवू”.