कल्याण – मुरबाड तालुक्यातील नांदेणी गावातील एका ४८ वर्षाच्या ग्रामस्थाने गावातील एका ग्रामस्थाबरोबर असलेल्या वादातून त्याच्या चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलाची सात वर्षापूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात कोयत्याने निर्घृण हत्या केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. पी. मुळये यांनी या प्रकरणातील आरोपी ग्रामस्थाला सबळ पुराव्यांचे आधारे जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जयवंत बबन भोईर (रा. नांदेणी, मुरबाड) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. सचिन कुलकर्णी, ॲड. कदंबिनी खंडागळे यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे ॲड. मंगेश देशमुख यांनी काम पाहिले. न्यायालय आणि पोलिसांचे समन्वयक म्हणून हवालदार अरविंद मोरे काम पाहत होते. मुरबाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.

याप्रकरणाची माहिती अशी, की मयत विद्यार्थी सुरज ज्ञानेश्वर भोईर (११) हा नांदेणी गावातील मुलगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता. मयत विद्यार्थी सुरज भोईर याचे कुटुंब आणि आरोपी जयवंत बबन भोईर यांच्यात पूर्ववैमनस्यातून काही वाद होते. २८ मार्च २०१८ रोजी सकाळची शाळा असल्याने सुरज भोईर नेहमीप्रमाणे गावातील ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी साडे सात वाजता गेला. गुरुजी शाळेत उपस्थित होते. विद्यार्थी आपल्या वर्गांची साफसफाई करत होते.

वर्ग खोलीतील झाडलोट केलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी सुरज भोईर, त्याचा मित्र संदेश भोईर हे शाळे जवळील आरोपी जयवंत भोईर यांच्या पडिक घराजवळ गेले. कचरा टाकून झाल्यानंतर सुरज याला लघुशंका आल्याने तो जयवंत भोईर याच्या पडिक घराजवळ लघुशंका करत होता. त्यावेळी तेथे असलेल्या जयवंत भोईर याने काही तरी कारणावरून सुरजशी वादावादी करून त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. सुरजचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरानंतर जयवंत याने स्वता विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो वाचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेणी शाळेतील शिक्षकाने याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी तपास करून जयवंत भोईर याला अटक केली होती. याप्रकरणात शिक्षण, विद्यार्थी असे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.