ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या दरम्यान वाऱ्यामुळे काहीठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर, काही ठीकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसेच काही सखल भागात पाणी साचले होते तर, कळव्यात वीजेचा लोखंडी खांब वाकल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त होत होती.

ठाणे महापालिका क्षेत्रात रविवार रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. मुंबई, नवी मुंबई आणि बदलापूरच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर काहीसा कमी होता. सोमवार रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवार सकाळपासून शहरात पावसाचे वातावरण होते. मात्र, दिवसभर पाऊस झालाच नाही. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढग दाटून आल्याने सर्वत्र काळोख झाला होता.

दुपारी २.१५ वाजता सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. पाऊस थांबताच काही वेळात या पाण्याचा निचरा झाला. कोपरी येथील ठाणेकरवाडी परिसरात मोठे वृक्ष उन्मळून पडले. तर, इंदीरानगर नाका येथे झाडाची फांदी तुटली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळवा येथील राणा टाॅवरजवळ एक वीजेचा लोखंडी खांब वाकला होता. यामुळे अपघातांची भिती व्यक्त होत होती. अर्धा ते पाऊण तासानंतर पाऊस थांबला असला तरी शहरात पावसाचे वातावरण कायम होते.