ठाणे : येथील नौपाडा परिसरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी येऊर येथील अनंताश्रमातील शेतात उतरून, बियाणे पेरत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेतला होता. ‘पेरणी ते कापणी’ हा उपक्रम जुलै महिन्यापासून दर शनिवारी घेण्यात आला. नुकतेच या रोपांची कापणी प्रक्रिया पुर्ण झाली असून विद्यार्थ्यांनी शेती प्रक्रिया अनुभवली.
ठाण्यामधील नौपाडा परिसरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास या संकल्पनेअंतर्गत विविध गोष्टींचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त व्हावे, या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अंदाजपत्रक तयार करणे, घराचे आर्थिक नियोजन, चिमुकल्यांसाठी साक्षरतेची जत्रा, व्यापार पेठ असे उपक्रम पार पडत असतात. अशाचप्रकारे विद्यार्थ्यांना शेतीच्या कामांची माहिती व्हावी, कृषी क्षेत्राबद्दल जागृकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व कळावे तसेच हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम समजावा अशा विविध हेतूने ‘पेरणी ते कापणी’ हा उपक्रम राबविला जातो.
यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष होते. ठाण्यातील येऊर येथील अनंताश्रम येथे या उपक्रमाचा जुलैमध्ये शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतात उतरून शेतीची कामे सुरू केली होती. विद्यार्थ्यांना मुळ बियाणांबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शेतात एका समांतर रांगेत बियाणांची पेरणी केली. लावणी होऊन शेतातील भाताची रोप तरारू लागली. या उपक्रमातील या रोपांची कापणी प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडली. शेतीचे महत्व आणि त्यातील अडचणी विद्यार्थ्यांनी अनुभवल्या.
पेरणी ते कापणी उपक्रमाची उद्दिष्ट्ये
शेतीचा प्रत्यक्ष अनुभव – विद्यार्थ्यांना शेतीची प्रक्रिया म्हणजेच पेरणीपासून कापणीपर्यंत, प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणे.हवामान बदलाची जाणीव – हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दल माहिती देणे.शेतकऱ्यांबद्दल आदर- शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यांचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता वाढवणे. निसर्गप्रेम – विद्यार्थ्यांना निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडणे.
यंदाच्या वर्षी ‘राज्य शासनाच्या आनंदी शिक्षण’ या योजने अंतर्गत पेरणी ते कापणी हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम दर शनिवारी घेतला जात होता. या उपक्रमाला जुलै महिन्यात सुरूवात करण्यात आली. उपक्रमात शेती शिक्षण शाळेची माजी विद्यार्थीनी सीमा हर्डीकर, अनंताश्रमाचे संकेत बोराटे आणि वीरेंद्र राठौर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना देण्यात आले.
