श्वसनाचे आजार वाढल्याचा मुद्दा रहिवाशांनी बैठकीत मांडला
ठाणे – राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे परिसरात फिरायला जागाच शिल्लक राहिलेली नसून त्याचबरोबर हवा प्रदुषणामुळे श्वसनाचे विकार होत आहेत. यामुळे ज्येष्ठांचे घराबाहेर पडणे बंद झाल्याचा मुद्दा स्थानिक नागरिकांनी रविवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. यानिमित्ताने मार्गाच्या कामामुळे होत असलेल्या हवा प्रदुषणाचा आणि त्यामुळे ज्येष्ठांची कोंडी झाल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिक हैराण असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दुपारी मुल्लाबाग येथील प्रकल्पस्थळी जाऊन रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. काॅसमाॅस लाउंज या इमारतीच्या क्लब हाऊसमध्ये पार पडलेल्या या बैठकीत स्थानिक नागरिकांनी त्यांना प्रकल्पामुळे भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे हवा प्रदुषणात वाढ झाल्याने खोकला, घशाचा संसर्ग आणि श्वसनासंबंधीच्या आजाराच्या तक्रारी वाढल्याचे सांगत त्यासंबंधीचे वैद्यकीय अहवाल स्थानिक रहिवाशांनी आव्हाड यांना दाखिवले.
यापुर्वी रहिवाशांच्या समितीने हा मुद्दा एमएमआरडीच्या बैठकीत मांडत वैदयकीय अहवाल सादर केले होते. भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नसताना नागरिकांना श्वसनासंबंधीचे विकार होऊ लागले आहेत. प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्यानंतर भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान, निघणाऱ्या दगड आणि मातीची वाहतूक सुरू झाली तर, परिसरात हवा आणि ध्वनी प्रदुषणात आणखी वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली.
प्रकल्प परिसरातील संकुलामध्ये तीन ते साडे तीन हजार ज्येष्ठ नागरिक राहत असून ते यापुर्वी संकुलासमोरील रस्त्यावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारायचे आणि त्याचबरोबर येथील कट्टयांवर त्यांच्या गप्पांचे फड रंगत होते. पण, मार्गाच्या कामामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढण्याबरोबरच फिरण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यातच हवा प्रदुषणात वाढ झाल्याने श्वसनाचे विकार होत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे, असा मुद्दाही काही ज्येष्ठ नागरिकांनी मांडला. एकूणच प्रकल्पामुळे वाढणारे प्रदुषण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, याबाबत स्थानिक नागरिकांनी बैठकीत चिंता व्यक्त केली.
मुल्लाबाग येथून काॅसमाॅसच्या गेटपर्यंत कन्व्हेयर बेल्ट यंत्र बसविण्यात येणार
मुल्लाबाग परिसरातील संकुलांमधील रहिवाशांनी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांची मुंबईत काही दिवसांपुर्वी एक बैठक पार पडली. या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार, नवीन मार्ग कसा असणार, याचा आराखडा दिलेला नाही. तसेच भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान, निघणारी माती आणि दगडांची वाहतूक दररोज शेकडो डम्परद्वारे होणार असून त्यासाठी मुल्लाबाग येथून काॅसमाॅसच्या गेटपर्यंत कन्व्हेयर बेल्ट यंत्र बसविण्यात येणार आहे. हा मार्ग बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबतही अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही, असा मुद्दा रहिवाशांनी बैठकीत मांडला.
कोट ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाला स्थानिकांचा विरोध नाही पण, या प्रकल्पामुळे नागरिकांना त्रास होत आहे. प्रकल्पासाठी झाडे कापण्यात आली आहेत. वाढलेल्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीचे विकार होत असून त्याचे वैदयकीय अहवाल त्यांच्याकडे आहेत. अनेकांनी हिरवळ परिसर पाहून ही घरे घेतली. महामार्गालगत वाहनांच्या वर्दळीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषण होते. ध्वनी प्रदुषणामुळे झोपमोड होते. हे सर्व टाळण्यासाठी अनेकांनी अंतर्गत मार्गालगत घरे घेतली. पण, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे त्यांच्या घरासमोरून ८० हजार वाहनांची दररोज वाहतूक होणार असल्याचा एमएमआरडीएचा अहवाल आहे. हा अहवाल पाहून त्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या मागण्या योग्यच असून त्या एमएमआरडीए आयुक्त, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून याप्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.