अंबरनाथः आशिया खंडातील सर्वात मोठ्या सुर्योदय सोसायटीत सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत असून त्यात सोसायटीतील आरक्षित भुखंडही वेगाने विकसित केले जात आहेत. मात्र या विकासात राजकाय पक्षांचे पदाधिकारी दलाली करत असून सोसायटी सदस्यांना अंधारात ठेवून भूखंड विकसित केले जात असल्याचा आरोप सोसायटी सदस्यांनी केला आहे. यामुळे सुर्योदय सोसायटीच्या सुनियोजीत विकासाला तडा जात असल्याचाही उल्लेख सदस्यांनी केला आहे. या पत्रानंतर एकच खळबळ उडाली असून सदस्यांचा रोख नेमक्या कोणत्या पक्षाच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांवर आहे असा प्रश्न चर्चिला जातो आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या तुलनेत पूर्व भागात हिरवेगारपणा अधिक आहे. यात सुर्योदय सोसायटीचा मोठा वाटा आहे. नियमानुकूल प्रक्रियेमुळे येथील वर्ग दोनचे भूखंड वर्ग एक करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास पुन्हा वेगाने होऊ लागला. सध्याच्या घडीला सुर्योदय सोसायटीत अनेक इमारती, बंगल्यांचा पुनर्विकास सुरू आहे. दोन ते चार ऐवजी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत.
त्याचवेळी सुर्योदय सोसायटीतील आरक्षित भुखंडांचा विकास करण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधीही सरसावले आहेत. मात्र हे होत असताना सोसायटीच्या समिती सदस्यांना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप सोसायटीच्या वतीने करण्यात आला आहे. सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टी आणि सचिव नरेंद्र काळे यांनी जाहीर केलेल्या पत्रात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
सुर्योदय सोसायटीच्या क्षेत्रात आरक्षित असलेल्या भुखंडांवर राजकीय पदाधिकाऱ्यांचा डोळा असल्याची बाब निदर्शनास आली आहे, असे सोसायटी सदस्यांनी जाहीर केलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे. या आरक्षित भुखंडांवर वेगवेगळे प्रस्ताव आणून त्यांचा ऐनकेन प्रकारे विकास करण्याचा चंग या काही पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. मात्र हे होत असताना सोसायटीच्या आरक्षित भुखंडांचे मोठा काळ रक्षण करणाऱ्या सोसायटी सदस्यांना अंधारात ठेवत हे प्रकार सुरू असून या मागे दलालीचा संशय सोसायटी सदस्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोसायटी सदस्यांना विचारात घेत त्यांच्या संमतीशिवाय आणि विश्वासात घेतल्याशिवाय आरक्षित भुखंडांचा विकास करू नये, अशी आग्रही भूमिका सुर्योदय सोसायटी सदस्यांनी घेतली आहे.
विकासाला विरोध नाही पण
सुर्योदय सोसायटीचा आरक्षित भुखंडांच्या विकासाला विरोध नाही. मात्र हे होत असताना फक्त निर्णय रेटून नेण्याचा प्रयत्न करू नका, अशी भूमिकाही सदस्यांनी घेतली आहे. दलालीच्या काही टक्क्यांसाठी सोसायटी सदस्यांना आणि सोसायटीला अंधारात ठेवू नका. आमच्याशी संवाद साधा, आम्हाला विश्वासात घ्या, अशी विनंतीही सोसायटी सदस्यांनी केली आहे. सुर्योदय सोसायटीत सध्या विकासकामे वेगाने सुरू आहेत. मात्र हे होत असताना काही राजकीय पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना संभ्रमीत करून आरक्षित भुखंड कंत्राटदारांच्या घशात घालून मलिदा लुटण्यासाठी आग्रही असल्याचा संशय सोसायटी सदस्यांना आहे. त्या सदस्यांनी या तथाकथित पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडेही केल्या आहेत. मात्र तरीही या पदाधिकाऱ्यांचा दलालीचा हव्यास सुटत नसल्याने सोसायटीचे सदस्य हतबल झाल्याची माहिती आहे.
ते पदाधिकारी कोण ?
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सुर्योदय सोसायटीच्या सदस्यांनी बोट ठेवले असले तरी आता हे सदस्य नेमके कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अंबरनाथ शहरावर शिवसेना शिंदे गटाचा वरचष्मा आहे. सोसायटी सदस्यांचा आरोप त्यांच्याबाबतीत तर नाही ना आणि हे पदाधिकारी कोण अशा चर्चा रंगल्या आहेत.