उल्हासनगर: प्रशासकीय कारभारात राज्यात अव्वल येणाऱ्या उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दुसऱ्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोर्चाला सामोरे जावे लागले. शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई, रेंगाळलेले रस्त्यांची कामे , शहरात धुळीचे साम्राज्य, शौचालयांची दुरावस्था अशा विविध मागण्या यावेळी ठाकरे गटाच्या वतीने मांडण्यात आल्या. पारा चाळीशीपार असतानाही ठाकरे गटाच्या आंदोलकांनी पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी पालिका सुरक्षारक्षकांसोबत आंदोलकांची बाचाबाचीही झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या मूल्यांकन उपक्रमात राज्यात उल्हासनगर महापालिका आयुक्त यांचा प्रथम क्रमांक आला. प्रशासकीय कारभारातील बहुतांश निकष पूर्ण केल्याने आयुक्त मनीषा आव्हाळे या राज्यात अव्वल आल्या. एकीकडे शहरात प्रशासकीय पातळीवर आयुक्तांचे कौतुक होत असले तरी शहरातील बहुतांश समस्या जैसे थे असल्याची चर्चा उल्हासनगरात रंगली होती.
उल्हासनगर महापालिका आयुक्त यांचा १०० दिवसातील कामगिरीचा आलेख वरचा असला तरी शहरातील समस्या मात्र तशाच असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उल्हासनगर महापालिका मुख्यालयावर जनअक्रोश आंदोलन करण्यात आले. कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी हे आंदोलन झाले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने उल्हासनगर महापालिका मुख्यालयाबाहेर यज्ञ करण्यात आला. आंदोलकांनी पालिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उल्हासनगर पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे आंदोलकांच्या शिष्ट मंडळाची अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनापुढे विविध प्रश्न मांडले.
उल्हासनगर शहरात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातून तीन ते चार दिवसच पाणी येते. पाणी विभागाकडून देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर आठवडाभर त्याचा परिणाम जाणवतो. शहरात पाणीपुरवठा सुरळीत नसताना पाणीपट्टीत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी धनंजय बोडारे यांनी केली.
शहरात एमएमआरडीच्या माध्यमातून महत्त्वाच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र या कामांमध्ये दिरंगाई होते आहे. परिणामी शहरातला मोठा भाग खोदण्यात आला आहे. खोदकामामुळे शहरात धुळीचे साम्राज्य आहे. नागरिकांना श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे आजार होऊ लागले आहेत. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही यावेळी बोडारे यांनी केली.
आयुक्तांना टोला
शहरातील रस्ते, पाणी, शौचालय आणि इतर समस्यांबाबत पालिकेचा ढिसाळ कारभार असतानाही किमान प्रशासकीय कारभारात तरी उल्हासनगर महापालिकेचा पहिला क्रमांक आला याचा आनंद आहे, असा टोला यावेळी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांना लगावला. प्रशासकीय कारभाराप्रमाणे शहरातला कारभारही सुधारेल अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. सध्या शहरातून नागरिक कल्याण, अंबरनाथ या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत याकडेही बोडारे यांनी यावेळी लक्ष वेधले.
फोटो आहे