ठाणे : मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या एका मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाले असले तरी यंदा लवकरच म्हणजेच मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे दुसऱ्या मार्गिकेचे काम अद्याप सुरूच होऊ शकलेले नाही. यामुळे या मार्गिकेची पावसाळ्यात आणखी दुरावस्था होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवज़ड वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. मुंबई, पालघर, तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो. हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता. मात्र, वन विभागाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती. परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते.

यामुळे खड्डे आणि कोंडी ही समस्या दरवर्षी दिसून येते. यंदा ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स (सीजीबीएम) या पद्धतीने रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलही लागू केले होते. या काळात ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती करण्यात आली होती. दुसऱ्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र, यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने दुसऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम रखडल्याचे चित्र आहे. जून महिना उजाडला तरी पावसामुळे हे काम सुरू होऊ शकलेले नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायमुख घाटात अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. याठिकाणी असलेला डांबरी रस्ता उखडतो. सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यास वनविभागाची परवानगी मिळत नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स (सीजीबीएम) या पद्धतीने रस्त्याच्या एका मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम केले. या पद्धतीनुसार याठिकाणी डांबरी रस्ता तयार करून त्यावर केमिकल मिश्रीत काँक्रीटचा थर टाकण्यात आला आहे. अशाचपद्धतीने दुसऱ्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार होते. परंतु पावसामुळे हे काम रखडले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.