केरळमधील एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघाताला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र ज्यांनी या घटनेची दाहकता अनुभवली आहे त्यांच्या मनात ही घटना अजूनही घर करून आहे. दरम्यान, कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान अपघातातील वाचलेले लोक अपघाताच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी एकत्र जमले होते. येथे त्यांनी त्यांना सहन करावा लागलेला आघात आणि जीवन बदलणारे अनुभव एकमेकांसोबत शेअर केले.

दोन वर्षांपूर्वी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी, अपघाताच्यावेळी घटनास्थळी धाव घेतलेल्या आणि बचावकार्य केलेल्या स्थानिकांसाठी रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी ५० लाखांची रक्कम जमा केली आहे. ही इमारत सार्वजनिक आरोग्य केंद्र (PHC) साठी बांधली जाईल, जी दुर्घटनास्थळाजवळील एकमेव सरकारी आरोग्य सुविधा आहे.

या अपघातग्रस्तांनी त्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईमधून या इमारतीसाठी पैसे जमा केले आहेत. अपघाताच्या वेळी ज्या लोकांनी साहसी बचाव कार्य केले त्यांचे आभार मानण्यासाठी ही इमारत बांधणार असल्याचं या अपघातग्रस्तांनी सांगितलं आहे. मलबार डेव्हलपमेंट फोरम (MDF) अंतर्गत स्थापन झालेल्या कृती मंचाने ७ ऑगस्ट रोजी दुर्घटनेच्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी (DMO) यांच्यासह रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या कृती मंचामध्ये, या अपघातामध्ये वाचलेले लोक आणि इतर १८४ प्रवाशांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.

Viral Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पूल-अप्स करून युट्यूबर्सनी रचला वर्ल्ड रेकॉर्ड; व्हिडीओ एकदा पाहाच

म्हणून घेतला रुग्णालय बांधण्याचा निर्णय

“दुर्घटनेच्या दिवशी, सर्वात जवळचे रुग्णालय सुमारे आठ किमी अंतरावर होते. अपघाताच्या ठिकाणापासून फक्त ३०० मीटर अंतरावर एक पीएचसी आहे परंतु तेथे सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे मंचाने या अपघाताच्या वेळी बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्वांसाठी रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे.” असे एमडीएफचे अध्यक्ष अब्दुरहिमान एडक्कुनी म्हणाले.

७ ऑगस्ट २०२० रोजी दुबईहून १९० लोकांसह एआयई फ्लाइट ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने पायलट आणि सह-वैमानिकासह अठरा लोक ठार झाले. यावेळी विमानाचे तुकडे झाले होते. संपूर्ण देश या अपघाताने हादरला होता.